नवी दिल्ली – जागतिक आणि देशांतर्गत कठीण परिस्थितीतही भारतीय आयुर्विमा महामंडळाचा म्हणजे एलआयसीचा आयपीओ यशस्वी झाला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी आयपीओसाठी बाली बोलली आहे. त्यांना काही निकषाच्या आधारे शेअरचे वितरण 12 मे रोजी करण्यात येणार आहे.
एलआसीची शेअर बाजारात नोंदणी 17 मे रोजी होईल. अर्थ मंत्रालयातील निर्गुंतवणूक विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी सांगितले की महागाई जास्त आहे, त्याचबरोबर रशिया- युक्रेन युद्धामुळे भारतासह जागतिक पातळीवरील शेअर बाजारांमध्ये नकारात्मक वातावरण असतानाही सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद दिला.
अपेक्षेप्रमाणे परदेशी गुंतवणूकदारांनी सध्याच्या परिस्थितीत एलआयसीच्या आयपीओला फारसा प्रतिसाद दिला नाही. मात्र देशातील किरकोळ आणि संस्थागत गुंतवणूकदारांनी हा आयपीओ यशस्वी करून दाखविला आहे. हे एक प्रकारे आत्मनिर्भर भारताचे लक्षण असल्याचे पांडे यांनी सांगितले. यामुळे देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. या माध्यमातून केंद्र सरकारने आपले एलआयसीमधील साडेतीन टक्के भागभांडवल विकले आहे.
मुळात पाच टक्के भाग भांडवल विकून किमान 60 हजार कोटी रुपये उभे करण्याचा सरकारचा संकल्प होता. मात्र दरम्यानच्या काळामध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे सरकारला आयपीओचा आकार कमी करावा लागला आणि केवळ 21 हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठरवावे लागले. मात्र अशा कठीण परिस्थितीतही आयपीओ निघाल्यामुळे सरकारचा आत्मविश्वास वाढला असून आता परिस्थितीत पूर्ववत झाल्यानंतर लगेच इतर कंपन्याची निर्गुंतवणूक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे दिसून येते.