पुणे – शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक ठिकाणी उत्तम शिक्षणासाठी आणि दैनंदिन अध्यापनासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नाहीत. काही शिक्षकांना पगार नाहीत. काहींना कमी पगारात काम करावे लागते. मात्र, अशा व्यवस्थेतही अडचणींवर मात करत शिक्षक जिद्दीने, चिकाटीने काम करून गुणवत्ता निर्माण करत आहेत, असे मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अयोगाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम विभागातर्फे आयोजित “शोध उत्कृष्ट अध्यापकाचा’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष रमेश चौगुले, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे समन्वयक सुनील जगताप व एकनाथ आंबले, स्वाती वाळके, रणजित बोत्रे, शैला शिरसागर, बाळासाहेब पवार, अतुल शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या यंदाच्या बजेटमध्ये 20.42 टक्के खर्च हा शिक्षणासाठी उपलब्ध होणार आहे. देशाच्या उत्पन्नातील किमान 3.5 टक्के खर्च शिक्षणासाठी केला जातो. मात्र, शिक्षणासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी हा खर्च अपुरा आहे. देशाच्या उत्पन्नातील किमान 6 टक्के खर्च शिक्षणासाठी उपलब्ध केल्यास आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होतील. सुविधांचा अभाव असलेल्या व्यवस्थेतही जगाच्या पाठीवर शिक्षकांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी डॉ. अशोक भोसले यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक सुनील जगताप यांनी केले. सूत्रसंचालन सुहास भंडारी यांनी केले. जानवी महाजन, अशोक चव्हाण या शिक्षकांसह इतरांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.