नवी दिल्ली – संविधान सुरक्षित राखण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष अबाधित ठेवण्यासाठी मदत करा. तसेच कट्टरता, व्देष आणि उदासीनतेला सत्तेपासून दूर ठेवा असं आवाहन सहाशेहून अधिक कलाकारांनी गुरूवारी पत्रक काढून मतदारांना केलं आहे. या पत्रकाखाली नसीरुद्दीन शाह, अमोल पालेकर, अनुराग कश्यप, डॉली ठाकोर, अभिषेक मजूमदार, अनामिका हक्सर, नवेज जौहर, एम के रैना, महेश दत्तानी, कोंकोना सेन शर्मा, रत्न पाठक शाह आणि संजना कपूर यांच्यासारख्या संपूर्ण भारतभरातील विविध कलाक्षेत्रातील 685 कलाकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि सर्वसमावेशक भारतासाठी मतदान करा, भाजप आणि त्याच्या मित्रपक्षाविरोधात मत द्या, कमजोरांना सशक्त करण्यासाठी आणि वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी मतदान करा, अस आवाहन या पत्राद्वारे करण्यात आल आहे, हे पत्रक विविध बारा भाषांमध्ये प्रसारित करण्यात आलं आहे. हे पत्रक आर्टिस्ट यूनाईट इंडिया वेबसाइट वर प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
आगामी निवडणूक ही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक संवेदनशील निवडणूक आहे. लोकशाहीने दुर्बल घटकांना सक्षम करायला हवे पण सध्याच्या सरकारने याविरुद्ध काम केलं आहे. विकासाच्या स्वप्नाआडून हिंदुत्त्ववाद, द्वेष आणि हिंसेचं राजकारण चाललं असल्याचा आरोप या कलाकारांनी पत्रकात केला आहे.
“ज्या व्यक्तीने पाच वर्षांपूर्वी देशाचा रक्षणकर्ता अशी प्रतिमा उभी केली होती, त्याने त्याच्या धोरणांद्वारे लाखो लोकांची उपजीविका नष्ट केली आहे.” असंही या पत्रकात म्हटलं आहे.