नवी दिल्ली – सध्याच्या सुटीसह नाताळापर्यंत देशाच्या विविध भागात रेल्वे तर्फे 2500 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सध्या सुटीची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दोनशे विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत, त्या व्यतिरीक्त या जादा गाड्या असणार आहेत.
तसेच गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन नियमीत स्वरूपाच्या गाड्यांना जादाचे डबे जोडण्याचे नियोजनही ठिकठिकाणी केले जात आहे असे रेल्वेच्या एका प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. आरक्षणाच्या डब्यांमध्ये अनारक्षित प्रवाशांची मोठी गर्दी होते ती रोखण्याची जबाबदारी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सवर सोपवण्यात आली आहे.
त्यासाठी सर्व महत्वाच्या स्थानकांवर जादा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनच्या कामांसाठीही जादा कर्मचारी नेमले जात आहेत. या गाड्यांच्या वेळापत्रकांविषयी प्रवाशांना वेळेत माहिती देण्याचीही व्यवस्था केली जात आहे.