बाळासाहेब थोरातांचे सुतोवाच ः 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा
मुंबई : शिवसेनेशी विळी-भोपळ्याचे नाते असलेली कॉंग्रेस आता सरकार स्थापनेसाठी उत्सुक आहे. सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आम्हाला मिळालेला नाही. शिवसेनेची तशी मानसिकता हवी. मात्र, तसा प्रस्ताव शिवसेनेकडून आल्यास त्याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू, असे सुतोवाच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिले. थोरातांच्या या वक्तव्याने सत्तास्थापनेसाठी राज्यात नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमिवर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
राज्यातील जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे आणि तो कौल आम्हाला मान्य आहे. मात्र शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी सोबत येण्यासाठीचा प्रस्ताव जर आला तर त्यासाठी दिल्लीत वरिष्ठांशी बोलून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे थोरात यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी पाच वर्ष जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करताना जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर लढा देत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभरात केलेल्या प्रचाराचा आघाडीला फायदा झाला. विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला चांगले यश मिळाले. महाआघाडीचे आणि पुरस्कृत मिळून 110 आमदार निवडून आले. त्यामुळे विरोधी पक्ष पूर्वीपेक्षा अधिक ताकदवान बनल्याचे थोरात यांनी सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून गेलेल्या आमदारांची मानसिकता आता बदलली असून त्यापैकी अपक्ष आणि मित्रपक्षाचे 10 आमदार संपर्कात असल्याचा दावाही थोरात यांनी केला.
विधानसभा निवडणुकीतील जनमताचा जो कौल आहे तो सत्तेच्या विरोधात आहे, असे आम्ही मानतो. कालच्या निकालातून जनतेने भाजपाचा सत्तेचा अहंकार उतरवला आहे. भाजपा नेते जमिनीवर आल्याने त्यांना आता विरोधकही दिसतील, असा टोला थोरात यांनी लगावला. भाजपने सत्ता, पैसा आणि यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्षातील आमदारांना पक्षांतर करण्यास भाग पाडले. मात्र, जनतेने बहुतांश आयाराम-गयारामांचा पराभव करून भाजपच्या मग्रुरुरीला चाप लावल्याची टीकाही त्यांनी केली. निवडणुकीत आमच्या 19 जागा 10 हजारपेक्षा कमी मतांनी पराभूत झाल्या. मुंबईसह अन्य शहरी भागात कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. शहरी भागात संघटन मजबूत करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे थोरात म्हणाले.
सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी माफी मागावी
मतदान झाल्यानंतर दोन दिवस जे अंदाज व्यक्त केले गेले ते अत्यंत चुकीचे होते. ज्या उमेदवारांनी एक लाख, 50 हजाराच्या फरकाने मताधिक्य घेतले ते उमेदवार पराभूत होणार असल्याचे वृत्तवाहिन्यांवर दिवसभर दाखवल्याने गेल्या दोन दिवसांत त्या मतदारसंघात तणाव तयार झाला होता. हे लक्षात घेऊन वृत्तवाहिन्यांनी ज्या संस्थेला सर्वेक्षणाचे काम दिले होते त्या संस्थांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी थोरात यांनी केली.