वॉशिंग्टन : अमेरिकेकडे 2014 पासून सात हजार महिलांसह 22 हजार भारतीयांनी आश्रय मागितला असल्याची माहिती पुढे आली आहे.
भारतातील बेरोजगारी किंवा असहिष्णुता हे अमेरिकेकडे आश्रय मागण्यामागचे प्रमुख कारण सांगण्यात येत आहेत, असे नॉर्थ अमेरिकन पंजाबी असोसिएशनचे (नापा)कार्यकारी संचालक सतनामसिंग चहल यांनी निवेदनात म्हटले आहे. अमेरिकन नागरिकत्व आणि स्थलांतरीत विभागाकडून माहितीच्या अधिकारात नापाला माहिती मिळाली. त्यानुुसार 2014 पासून 22 हजार 371 भारतीयांनी अमेरिकेकडे आश्रय मागितला आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे, असे चहल म्हणाले.
आश्रय मागणाऱ्यांमध्ये सहा हजार 935 महिला तर 15 हजार 436 पुरुषांचा समावेश आहे. आश्रय मागणाऱ्यांसाठी काम करणारे चहल यांनी सांगितले की, अमेरिकेत बेकायदा येऊन आश्रय मागितल्यास त्यांच्या हालअपेष्टांमध्ये वाढ होईल. त्याबाबतची प्रक्रिया अत्यंत गुंतागुतीची आणि क्लिष्ट आहे. त्यामुळे मन:स्ताप होतो. याशिवाय आश्रय मागणाऱ्यांना अनेक महिने काम करण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे आर्थिक कोंडी होते.
अमेरिकेकडे 2017 मध्ये आश्रय मागणारी पाच लाख 42 हजार 411 प्रकरणे संबंधीत न्यायलयात प्रलंबित होती. ती 2019मध्ये वाढून 10 लाख 23 हजार 767 झाली आहेत,अशी माहितीही चहल यांनी दिली.