पुणे – गेल्या आठवडाभरापासून राज्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या पुरामुळे 13 जिल्ह्यांतील 77 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 2 लाख 1 हजार 496 हेक्टर शेतीक्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यापैकी पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून 100 टक्के अनुदानातून फळबागांची पुनर्उभारणीसाठी सर्वोतपरी मदत केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेती नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तालयांतर्गत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक शुक्रवारी झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले, सॅटेलाईटच्या माध्यमातून नुकसानीची आकडेवारी संकलित केली जात आहे. पुराचा सर्वाधिक फटका कोल्हापूरला बसला आहे. तसेच पुरामुळे शेतकरी व फळबागायतदारांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या मदतीने सुरू आहेत. तर बैठकीत द्राक्षबागायतदारांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. यात आता द्राक्षबागांचा समावेश फळबागांमध्ये करण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली. तसेच शेती करताना पाण्याचा माफक वापर व्हावा, याकरिता ठिबक सिंचनाला प्रोत्साहन मिळावे, म्हणून 80 टक्के सबसिडी दिली आहे. आतापर्यंत राज्यात 24 लाख 20 हजार ठिबक सिंचन बसविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.