जयपूर – राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधील योजना भवनाच्या तळघरातून तब्बल 2.31 कोटी रुपयांहून अधिक रोख आणि एक किलो सोने जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कपाटात ठेवलेल्या ट्रॉली सुटकेसमध्ये 2000 आणि 500 च्या नोटा होत्या. एवढी मोठी रोकड व सोने कोणी ठेवले होते, याचा तपास सुरू आहे.
योजना भवनमध्ये आयटी विभाग, जन आधार प्राधिकरण यासारख्या संवेदनशील विभागांची कार्यालये आहेत. सरकारी खात्याच्या कपाटातून कोट्यवधींची रोकड आणि सोने सापडल्याच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणी योजना भवनातील 7 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुख्य सचिवांनी संपूर्ण घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुख्य सचिव उषा शर्मा, डीजीपी उमेश मिश्रा आणि जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली. दुसरीकडे या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, या घडामोडीत यूआयडीशी संबंधित एक अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आहे.