मुख्य सचिवांना माफी मागण्याचे दिले आदेश
मुंबई, दि. 2 – राज्यभरातील आमदार विधीमंडळात आपले औचित्याचे मुद्दे उपस्थित करतात. मात्र, त्या मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांना वेळेत उत्तरेच मिळत नाहीत. नागपूर अधिवेशनात आमदारांनी विधानसभेत 83 औचित्याचे मुद्दे उपस्थित केले होते. त्यापैकी केवळ 4 मुद्द्यांचीच उत्तरे आली आहेत. तहसीलदारही आमदाराचे ऐकत नाहीत. सार्वभौम सभागृहाचा हा अपमान आहे. तो सहन केला जाणार नाही, यासाठी मुख्य सचिवच जबादार असून त्यांनी न्यायासनासमोर उभे राहून सभागृहाची माफी मागावी, असे निर्देश संतप्त अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिले.
अध्यक्षांचा रुद्रावतार पाहून अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करीत प्रशासनाच्यावतीने दिलगिरी व्यक्त करून अध्यक्षांचा राग शांत केला. “मागच्या अधिवेशनात 83 औचित्याचे मुद्दे होते. त्यापैकी फक्त 4 उत्तर पाठवली आहेत. विधिमंडळाच्या सभागृहात झालेल्या कामकाजाबाबत सचिवालयात अधिकारी दखल घेत नाहीत. या प्रश्नावर एक महिन्याच्या आत उत्तर देण्याचे निर्देश देऊनही अधिकारी ऐकत नाहीत. मी जोपर्यंत खुर्चीत आहे तोपर्यंत माझ्या सभागृहाचा अपमान केला तर मी कारवाई करणारच.
तहसीलदार पण आमदारांचं ऐकत नाही, आदर करत नाही, आदेश कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. या वागणुकीला मुख्य सचिवांनाच जबाबदार धरलं जाईल. मुख्य सचिवांनी प्रशासन कसे काम करते याकडे बघितले पाहिजे.’ अशी नाराजी व्यक्त करीत थेट मुख्य सचिव अजोय मेहता यांना सभागृहासमोर उभे राहून माफी मागण्याचे निर्देश दिले. विधानसभा अध्यक्षांनी जर एखाद्याला जेलमध्ये पाठवायचे निर्देश दिले तर त्याला जामीनही मिळू शकत नाही, असेही अध्यक्ष म्हणाले.
मुख्य सचिवांना एवढी मोठी शिक्षा नको – उपमुख्यमंत्री
अध्यक्षांनी सभागृहाची संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केली. अजित पवार म्हणाले, विधिमंडळाच्या इतिहासात यापूर्वी असं कधीच घडलेले नाही. एवढी टोकाची भूमिका घेऊन मुख्य सचिवांना एवढी मोठी शिक्षा नको. त्याऐवजी त्यांना आधी समज द्या.
शासनाच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा अशी वेळ येणार नाही, याबाबत खबरदारी घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यापाठोपाठ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अध्यक्षांना एवढी कठोर कारवाई नको असे सांगितले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ही शिक्षा कठोर असल्याचे सांगून अधिकाऱ्यांना दालनात बोलवा. पुढील वेळी असे वागल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी समज द्या असे सांगितले. अखेर सगळ्यांच्या आश्वासनानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपली कारवाई मागे घेतली.