मुंबई – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारवर टीकेची झोड उठवत खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे संपूर्ण शहरे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप केला.
गद्दारांच्या टोळीने आपल्या ह्या शांतीप्रिय आणि प्रगतशील महाराष्ट्राचे रूपांतर ‘बिल्डर्स आणि कंत्राटदार’ मिळून चालवत असलेल्याला एका बेकायदेशीर राजवटीत केले, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्राद्वारे केला आहे.
हे आपलं वर्ष आहे ! आपण हे वर्ष फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी समर्पित करायला हवं! भारताच्या लोकशाही मूल्यांचं आणि संविधानाचं कायदेशीर बाबींचाच वापर करून खच्चीकरण केलं जाताना दिसत आहे. जगभरात जिथे जिथे लोकशाही संपुष्टात आली, तिथे ती संपवण्यासाठी अश्याच संस्थांचा वापर केला गेला होता.
ज्या खरंतर लोकशाहीच्या रक्षणासाठी अस्तित्वात आल्या होत्या. लोकशाही संपवून हुकूमशाही निर्माण झालेल्या ठिकाणी आजपर्यंत सामान्य लोकांच्या भल्यासाठी काहीही झालेले नाही. जे काही केले गेले ते केवळ काही मोजक्या लोकांसाठी, तुमच्या-माझ्या सारख्या १.३ अब्ज लोकांसाठी तर नक्कीच नाही !
आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचे झालं तर, पुन्हा लोकशाही अस्तित्वात आणणे हेच आपलं ध्येय आहे. २०२२ च्या मध्यात गद्दारांच्या टोळीने आपल्या ह्या शांतीप्रिय आणि प्रगतशील महाराष्ट्राचं रूपांतर ‘बिल्डर्स आणि कंत्राटदार’ मिळून चालवत असलेल्याला एका बेकायदेशीर राजवटीत केले, असे आदित्य यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
आणि आता, खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आपली शहरं उद्धवस्त होत आहेत. रस्ते, विकास योजनांमध्ये घोटाळे होत आहेत. उद्यानं गिळंकृत केली जात आहेत. इतकंच नाही तर, रस्त्यावरील फर्निचर, सॅनिटरी पॅड्स ह्यांच्या बाबतीतही घोटाळे होत आहेत. आणि हे तर केवळ भ्रष्ट कारभाराचं वरवरचं टोक आहे.