मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवले, त्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. दोन्ही गटाकडून रोजच आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले तर शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.
“शिंदे गटाला काय चिन्ह मिळाले यावर बोलण्याची आवश्यकता नाही. आमची मशाल ही धगधगती आग आहे आणि ४० मुंडक्यांच्या रावणाला ही आग पेटवल्याशिवाय राहणार नाही”, अशी शब्दात मनिषा कायंदे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
“निवडणूक आयोगाने जे नाव आम्हाला दिले, तो अंतरिम निर्णय आहे. आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली आहे. दिवंगत रमेश लटके हे शिवसैनिक होते आणि जे सोडून गेले ते म्हणतात, आम्ही शिवसैनिक आहोत. मग एका जागेसाठी एवढा अट्टहास का?” असा सवालही त्यांनी शिंदे गटाला यावेळी विचारला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “आम्हाला जी मशाल मिळाली आहे, ती घरोघरी पोहोचवण्याचे काम आम्ही करू. या पोटनिवडणुकीत आमचाच विजय होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “जे धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांनी ठरवले, ते गोठवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, हे कोणालाही पटणारे नाही”, असे त्यांनी सांगितले.