मयूर सोनावणे
सातारा – करोनामुळे प्राथमिक शाळेपासून माध्यमिक शाळांच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या असून शालांत (इयत्ता दहावी) परीक्षेचा भूगोलाचा उर्वरित पेपरही रद्द करण्यात आला आहे. मात्र, प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ई-लर्निंगचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांच्या घरातील लोकांकडे अँड्रॉइड स्मार्टफोन नसल्याने ई-लर्निंगसाठी अनेक विद्यार्थी एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यातून करोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त करत वाई तालुक्यातील शिक्षक संघटनांनी ई-लर्निंगला विरोध दर्शवला आहे.
जगभरात थैमान घातलेल्या करोनाने भारतातही चांगलाच शिरकाव केला असून आजमितीला देशात करोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आता लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
लॉकडाऊन मुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व काही बंद आहे. शाळा, महाविद्यालये बंद असून पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतची घोषणा राज्य सरकारने केली होती. विद्यापीठ व लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढील आदेश येईपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. इयत्ता नववी व इयत्ता 11 वीच्या परीक्षांचे काय, याचा निर्णय मात्र शासनाने अद्याप घेतलेला नाही.
या परिस्थितीत प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ई-लर्निंग प्रणाली राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनाही ई-लर्निंगद्वारे शिक्षणाचे धडे दिले जावेत, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळा खेडेगावांमध्ये असल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये अँड्रॉइड स्मार्टफोन असतील, असे नाही. ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे, अशा विद्यार्थ्यांच्या घरी इतर विद्यार्थी गर्दी करतील. अशा प्रकारे गर्दी झाल्यास करोनाचा फैलाव होण्याची भीती असल्याने ई-लर्निंगला वाई तालुक्यातील शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे.
शिक्षकांचा गैरसमज
ई-लर्निंगचा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय नाही. मात्र, ई-लर्निंग म्हणजे ऑनलाइन परीक्षा, अशी ओरड काही शिक्षकांनी गैरसमजातून केली आहे. सध्याच्या घडीला ऑनलाइन परीक्षा घेणे योग्य नसून त्या रद्द कराव्यात, अशी मागणी शिक्षकांनी गैरसमजातून केली आहे.
…तर जबाबदार कोण?
नोकरीनिमित्त पुणे, मुंबईत वास्तव्यास असलेली हजारो कुटुंबे करोनामुळे पुन्हा आपल्या गावी आली आहेत. हे लोक घरात न बसता पै-पाहुण्यांच्या गाठीभेटी घेत फिरत आहेत. गावात ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा अथवा अँड्रॉइड फोन नाही, असे विद्यार्थीं किंवा त्यांचे पालक ई-लर्निंगसाठी पुणे, मुंबईवरून आलेल्यांकडून मोबाइल घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दुर्दैवाने यातून कोणा विद्यार्थ्याला करोनाचा संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल शिक्षक उपस्थित करत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात अध्ययन प्रक्रिया न थांबवता ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. ऑनलाइन परीक्षेचे नियोजन नाही.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून सूचना दिल्या आहेत. त्याचे वेळापत्रक तयार होत असून प्रत्येक विषयाला स्वतंत्र लिंक देण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये “दीक्षा ऍप’ डाऊनलोड करायचे आहे.
– प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सातारा.