शिरूर (पुणे) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशीदीवरील भोंग्याच्या विधानावरून राज्यातील राजकारण तापले आहे. अशात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान जातीय, धार्मिक समानतेचा संदेश दिला आहे. शिरूर तालुक्यातील मलठण येथील जाहीर कार्यक्रमादरम्यान दिलीप वळसे पाटील यांचे व्यासपीठावर भाषण सुरु होते. त्याचवेळी मशिदीत अजान सुरु झाले. यावेळी गृहमंत्र्यांनी भाषण थांबवून धार्मिक समानतेचा संदेश दिला. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरु केले.
दरम्यान, 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशारा ठाकरेंनी दिला होता.
यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळायला हव्या. अजानचे भोंगे लावायचे आहेत त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. ज्यांना हनुमान चालिसा लावायची आहे त्यांनीही जरुर लावावी पण तिकडे अजान होत असते त्याचवेळी लावू नये.’ तसेच अजानचा भोंगा आहे म्हणून हनुमान चालिसा लावू हा काही विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही, असेही गृहमंत्री म्हणाले.