शिरूर (प्रतिनिधी) – रांजणगाव औद्योगिक वसाहत सुरू करू नये, अशी मागणी आता स्थानिकांमधून होत आहे. औद्योगिक वसाहत सुरू झाली तर तेथे काम करणारी लोक कंपनी व्यवस्थापनाने त्या लोकांची राहण्याची, खाण्याची व झोपण्याची व्यवस्था कंपनीतच करावी अशीही मागणी होत आहे.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अडीचशे ते तीनशे कंपन्या असून याठिकाणी हजारो कामगार काम करत आहे. हे कामगार नगर जिल्हा, पुणे जिल्हा, पुणे शहर, शिरूर तालुका, शिरूर शहर, पुणे जिल्ह्यातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणात कामासाठी रोज ये-जा करीत असतात. सध्या करोना व्हायरस संसर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होत असून त्यात पुणे व नगर हे दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. त्यात या भागातून कामगार औद्योगिक वसाहतीत येत असतील तर त्यामुळे करोना व्हायरस पसरण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे. केवळ उद्योग सुरू करून चालणार नसून या माध्यमातून येणारे कामगार यांच्यामार्फत जर करोनाव्हायरस या भागात पसरला तर याला जबाबदार कोण? त्यासाठी प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतीने यामध्ये लक्ष घालून या औद्योगिक वसाहती सुरू होणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
औद्योगिक वसाहत सुरू झाली तर या परिसरात असणाऱ्या ग्रामपंचायती या येथील कामगारांना आपल्या गावांमध्ये येऊ देणार नाही व बाहेरच्या बसेसही येऊ देणार नाहीत. कंपनी व्यवस्थापनाने आपल्या कंपन्यांचे प्रॉडक्शन सुरू करायचे असेल तर या ठिकाणी येणारे कामगार यांच्या राहण्याची, जेवणाची व झोपण्याची व्यवस्था कंपनीतच करावी अशी मागणी या परिसरातून होत आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीत सुरू करण्यास आमची हरकत नाही; परंतु या कंपनीतून येणारे विविध शहरांतील कामगार यांच्यामुळे या भागात करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भीती रांजणगाव व परिसरातील गावकऱ्यांना आहे. तरीदेखील कंपन्या सुरू करायच्या असतील तर कंपनी व्यवस्थापनांनी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या राहण्याची व जेवणाची सुविधा कंपनीतच करावी.
-सर्जेराव खेडकर, सरपंच रांजणगाव गणपती