मुंबई: मर्यादित षटकांच्या सामन्यातील धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा कसोटी सामन्यातही सलामीवीर म्हणून यशस्वी होईल असा आत्मविश्वास भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने व्यक्त केला.
वेस्ट इंडिजमधील दौऱ्यात रहाणे याने कसोटीत शतक ठोकले होते. तसेच त्याने हनुमा विहारीच्या साथीत दमदार भागीदारीही केल्या होत्या. हे दोन्ही खेळाडू मधल्या फळीत यशस्वी ठरल्यामुळे रोहितला आघाडीस पाठविण्याचा निर्णय भारतीय निवड समितीने घेतला आहे.
या निवडीबाबत रहाणेने सांगितले की, रोहितची निवड अंतिम अकरा खेळाडूंमध्येच स्थान देण्यासाठी झाली आहे. त्याच्यासारख्या गुणवान खेळाडूला राखीव खेळाडू म्हणून पॅव्हेलियनमध्येच बसविणे मला योग्य वाटत नाही. रोहितने आतापर्यंत 27 कसोटी सामन्यांमध्ये तीन शतके झळकाविली आहेत. जरी त्याची शैली मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी योग्य असली तरी कसोटीतही त्याचा उपयोग मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना होऊ शकतो. कसोटी सामन्यात चमक दाखविण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये विचार करण्यास फार वेळ नसतो तर कसोटीत नियोजनबद्ध खेळास संधी असते. रोहित हा सर्वच तंत्रांमध्ये चपलख बसणारा खेळाडू आहे.
कसोटी सामन्यांसाठी खूप मेहनत करावी लागते. या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजही विविध वेळी वेगवेगळे तंत्र उपयोगात आणत फलंदाजांची खडतर परिक्षाच पाहत असतात. भरपूर मेहनत करून कसोटी सामन्यात फलंदाजी करणे सोपे जाते. खेळाडूने स्वत:च्या क्षमतेवर आत्मविश्वास ठेवला पाहिजे असेही रहाणेने सांगितले.
रहाणे पुढे म्हणाला की, कसोटी सामन्यांप्रमाणेच मर्यादित षटकांच्या सामन्यांचाही मी भरपूर आनंद घेतला आहे. वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी मी उत्सुक आहे. त्यादृष्टीने मी खूप मेहनत करीत आहे. त्यासाठी मी कौंटी लीगमध्ये सराव करण्याचा माझा मानस होता. माझी ही इच्छा पूर्ण झाली. हॅम्पशायर संघाने मला निमंत्रित केले होते. या स्पर्धेतील अनुभव मला खूप फायदेशीर ठरला आहे. या लीगमध्ये खेळताना मला क्रिकेटखेरीज अन्य सर्व व्यवस्थाही स्वत:लाच कराव्या लागतात. त्यामुळे आपोआपच वैयक्तिक व्यवस्थापनातही मी तयार झालो आहे.