नवी दिल्ली -करोना व्हायरसचा संसर्ग जगभरात वाढला आहे. त्यामुळे औषध तयार करण्यात अग्रेसर असलेल्या भारतीय कंपन्यांच्या औषधांना चांगलीच मागणी आली आहे. भारतातील गरजांची पूर्तता करण्यासाठी भारत सरकारने औषधांच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे. औषधाची उपलब्धता आणि विविध देशाची गरज पाहून भारत सरकार या औषधाच्या निर्यातीला परवानगी देणार आहे. मात्र असे असले तरी औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांना परस्पर परदेशात औषधाची निर्यात करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
करोनाव्हायरसवर उपयुक्त ठरणारी अनेक औषधे भारतातील कंपन्या मोठ्या प्रमाणात तयार करीत आहेत. त्यामुळे विविध देशाकडून औषधांची मागणी चालू आहे. या निर्यातीवर नियंत्रण राहण्यासाठी सरकार स्वतः याची देखरेख करणार आहे. विविध देशांना मागणी भारत सरकारकडे नोंदविण्यास सांगण्यात आले आहे.
संबंधित देशातील आरोग्यविषयक परिस्थिती आणि इतर बाबींचा विचार करून भारत सरकार याबाबत कोणत्या देशाला कोणते औषध किती प्रमाणात पाठवायचे याचा निर्णय घेईल. त्यानंतर संबंधित कंपन्यांकडून हे औषध पाठविण्यास सांगण्यात येईल. भारतातील खाजगी कंपन्यांना किंवा निर्यातदारांना परदेशातील कोणत्याही खासगी कंपनीला किंवा आयातदारांना औषध निर्यात करता येणार नाही असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.
गेल्या पंधरवड्यात भारत सरकारने करोनाव्हायरस संदर्भातील औषधाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र अमेरिकेची गरज पाहून भारताने हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन नावाचे औषध अमेरिकेला पाठवून दिले आहे. त्यानंतर भारताने प्रत्येक देशाचा वेगळा विचार करून औषधे उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझील सरकारने भारताकडे औषधांची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्याचबरोबर युरोपातील अनेक देशातील परिस्थिती खराब झाल्यामुळे युरोपातील या देशातून मागणी आल्यास त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले.
भारतातील औषधी कंपन्यांची उपयोगिता आणि कार्यक्षमता या परिस्थितीमुळे सिद्ध झाली आहे. विविध क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाला असला तरी भारतातील औषधी कंपन्यांची उलाढाल या काळात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन भारतातील कंपन्यांनी औषधाची निर्यात आगामी काळात वाढविण्याचा प्रयत्न करावा असे उद्योजकांच्या संघटनांनी सुचविले आहे.