हडपसर – पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर काही राजकीय घटकांकडून गांधी परिवाराला दूषणे दिली जाऊ लागली आहेत. वास्तविक काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या निवडणूकीत घेतलेले कष्ट साऱ्या देशाने पाहिले आहेत. तरीही पक्षाच्या पदरात अपयश आले असले तरी काँग्रेसला पुन्हा वैभवाच्या शिखरावर घेऊन जाण्याची किमया गांधी परिवारच साधू शकतो. त्यामुळे गांधी परिवारानेच काँग्रेसचे नेतृत्व केले पाहिजे ,अशी आग्रही मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केली आहे.
बाळासाहेब शिवरकर म्हणाले की, पाच राज्यांतील निवडणूक पराभवानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व सोडून द्यावे अशी मागणी काही घटकांकडून केली जात असली तरी त्या मागे केवळ परिवारद्वेष हेच मुख्य कारण आहे. आज इतक्या अवघड काळातही पक्षाचे संघटन एकसंध राहण्यामागील मुख्य शक्ती किंवा प्रेरणा हा गांधी परिवारच आहे ही बाबही प्रकर्षाने लक्षात घ्यावी लागेल. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जे योगदान दिले आहे किंवा जे अतोनात कष्ट घेतले आहेत ते दुर्लक्षित करता येण्याजोगे नाहीत.
काँग्रेस नेतृत्वाची बदनामी करून आणि खोटेपणा करून निवडणुका जिंकण्याचे तंत्र आज अवलंबले गेले आहे. यातील तथ्य कधीना कधी उघडे पडणारच आहे आणि शेवटी जे सत्य आहे त्याचाच विजय होणार आहे. या संघर्षात काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांना कडवी लढाई करावी लागणार आहे. एकट्या गांधी परिवारारच ही जबाबदारी सोपवून भागणार नाही. पक्षाच्या वाट्याला आज पराभव आला असेल तर पक्षाच्या यंत्रणेत काम करणाऱ्यांचीही ती तृटी आहे आणि ती भरून काढण्यावर आता आपल्याला लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. गांधी परिवाराची बदनामी करणाऱ्यांचाही समर्थपणे आपल्याला मुकाबला करावा लागणार आहे असेही शिवरकर यांनी म्हटले आहे.
गांधी परिवाराच्या मागे एकजुटीने उभे राहणे, आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा जनतेपुढे उघडा करणे या द्विसूत्रीने काँग्रेसची लढाई यापुढे सुरू ठेवावी लागणार आहे असेही शिवरकर यांनी म्हटले आहे. आणि पक्षाचे सर्वच निष्ठावान आणि जिगरबाज कार्यकर्ते ही लढाई समर्थपणे पुढे नेतील असा विश्वासही शिवरकर यांनी व्यक्त केला आहे.