नगर -करोनाच्या प्रभावातील जिल्ह्यांमधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता काही भागात अटी-शर्तींच्या अधिन राहून काही उद्योग आणि व्यवसायांना परवानगी देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील अर्थचक्र पुन्हा एकदा गतिमान होईल, अशी अपेक्षा सध्या तरी फोल ठरली आहे. करोनासंबंधित मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करून उद्योग सुरू करण्याचे मोठे आव्हान उद्योजकांपुढे असल्यामुळे आजही जिल्ह्यात मोठ्या उद्योगांसह लहान उद्योग अटी शर्तींच्या कचाट्यात अडकली आहेत. त्यामुळे काही उद्योग केवळ देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली सुरू झाले आहेत.
जिल्ह्यात 14 मोठे व 200 सूक्ष्म लघुउद्योग सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात नगरच्या औद्योगिक क्षेत्रात 25 ते 30 उद्योग तुटपुंज्या कामगारांवर सुरू झाले आहेत.
लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या काही उद्योग, व्यवसायांना परवानगी देण्यात आली असली, तरी त्यांना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. उद्योग सुरू करण्यासाठी कारखाना मालकांना एमआयडीसीच्या संकेतस्थळावर तशी ऑनलाईन नोंद करावी लागणार आहे. तसेच
सध्या तरी नगर औद्योगिक वसाहतीमधील 25 ते 30 कारखाने सुरू झाले आहेत.
करोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कामगार-कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी बसची व्यवस्था करावी लागणार आहे. हे मोठे आव्हान आहे. जिल्ह्यातील 814 कारखान्यांनी “एमआयडीसी’च्या मुख्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केले असून, त्यापैकी 600 कारखान्यांना परवानगी मिळाली आहे.ज्या कारखान्यांतील काम अवघ्या एक-दोन कामगारांच्या माध्यमातून होते, असे अगदी छोटे असलेले 200 कारखाने सुरू झाले आहेत. त्यात बहुतांशी ग्रामीण भागातील कारखान्यांचा समावेश आहे. नगरचे नागापूर औद्योगिक क्षेत्र तसेच नेवासे, पारनेर, सुपे, भाळवणी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव अशा शहरांतून मिळून जिल्ह्यात 43 मोठ्या कंपन्या आहेत व आठ हजारांवर लघु-मध्यम उद्योग आहेत. या कंपन्यांतून कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त दीड-दोन हजारांवर कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना आणण्यासाठीची बस व्यवस्था या कंपन्यांच्या व्यवस्थापनासमोर आव्हानात्मक झाली आहे.
शिवाय यापैकी काही कंपन्यांतून परराज्यातील मजूरही काम करतात. पण यापैकी अनेक जण आपल्या गावी परत गेले आहेत. त्यामुळे त्यांना कसे आणावे कसे, असा प्रश्न आहे. प्रशासनाकडून 14 मोठे व 200 सूक्ष्म लघुउद्योग सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र सूक्ष्म लघुउद्योग जे काही सुरू झाले आहे, त्यात ग्रामीण भागातील उद्योगांचा समावेश आहे. सुपे व नगर औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरू होण्याचे प्रमाण कमी आहे. जे काही मोठे उद्योग सुरू झाले असल्याचे सांगण्यात येते, ते केवळ देखभाल दुरुस्तीसाठी सुरू झाले आहे. कामगारांना ने-आण करण्याची व्यवस्था नसल्याने हे कारखाने नावाला सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
ते अर्थात देखभाल दुरुस्तीसाठी सुरू करण्यात आले आहेत. कामगारांना बसची व्यवस्था करण्याच्या अटीमुळे हे कारखाने सुरू होवू शकत नाहीत. जर दुचाकीला परवानगी दिली, तरच काही प्रमाणावर कारखाने चालू होती. अर्थात लॉकडाऊनमुळे अनेक कामगार बाहेरगावी गेले आहे. त्यामुळे कारखाने चालू झाले, तरी ते 25 ते 30 टक्के प्रमाणात हे सुरू होतील. 15 हजार कामगार नगरच्या एमआयडीसीमध्ये काम करतात. त्यांना आता रोजगाराची गरज आहे. त्यांच्यावर उपसामारीची वेळ आली आहे. ते कामगार येण्यास तयार आहे. पण बस हा मोठा अडसर आहे.
अशोक सोनवणे, उद्योजक
कारखान्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी कोणतीही अडचण नाही. आतापर्यंत 814 कारखान्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 14 मोठे व 200 लहान उद्योग सुरू झाले आहेत. सुपे व नगरमधील कारखान्यांचा त्यात समावेश आहे.कामगारांचा प्रश्न येत आहे. पण ज्या ठिकाणी कमी कामगार आहेत, ते कारखाने सुरू झाले आहेत.
एस. एस. गवळी, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र