पुणे – जिल्ह्यातील सात धरणे पूर्णपणे रिकामी झाली आहेत. तर 17 धरणांमध्ये एकूण 13 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन 15 जुलैपर्यंत करणे आवश्यक आहे. दरम्यान शासनाने धरणातील पाणी हे पिण्यासाठीच राखीव असल्याचे जाहीर केले आहे.
मागील वर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर झाले. त्यानंतर दोन महिने पावसाने चांगली हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली. त्यामुळे जिल्ह्यातील भिमा खोऱ्यातील धरणांतून पाणी नदीतून सोडण्यात आले. खडकवासला प्रकल्पातील धरणेही पूर्ण भरली. खडकवासला धरणातून सुमारे 19 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले. हे पाणी पुढे उजनी धरणात पोहचते. त्यानंतर मात्र परतीच्या पावसाने निराशा केली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस न झाल्याने धरणांच्या पाणीतापळीत वाढ झाली नाही. त्यामुळे पाणीसाठा स्थिर राहिला. शासनाने जिल्ह्यातील 13 पैकी 10 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. सध्यस्थितीत भिमा खोऱ्यातील 24 धरणांपैकी 17 धरणांमध्येच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठाही अत्यल्प असाच आहे. दरम्यान साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते.
त्यावेळी सर्वत्र पाऊस सुरू होऊन जमिनीमध्ये पाणी मुरण्यास सुरुवात होते. साधारणपणे एकूण 100 मीमी पाऊस झाल्यानंतर ओढ्यांना पाणी सुरू होते. ओढे-नाले-नदींमधून पाणी धरणात जमा होण्यास सुरूवात होते. त्यामुळे या उपलब्ध पाण्याचे नियोजन 15 जुलैपर्यंत करणे आवश्यक आहे.