नवी दिल्ली – कोणत्याही सरकारने सर्व नागरिकांना अन्य काहीही मोफत न देता फक्त शिक्षण आणि आरोग्य सेवा मोफत द्याव्यात. परदेशात अनेक ठिकाणी या सेवांसाठी कसलाही खर्च नसतो. शिवाय या दोन सेवा मोफत दिल्यास नागरिकांचे जीवन अधिक सुकर होऊ शकते, असे प्रतिपादन दिल्लीतील भाजप नेते विष्णू मित्तल यांनी केले आहे. दिल्लीतील सनलाईट कॉलनी येथे मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना मित्तल बोलत होते.
मित्तल म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीत मोफत योजनांच्या घोषणा अनेक राजकीय पक्षांकडून सातत्याने वाढत आहेत. सर्वच राजकीय पक्षांना मोठमोठ्या मोफत योजनांची घोषणा करून मतदारांची मते मिळवायची आहेत. मात्र या योजना तत्कालीक लाभाच्या असतात आणि कालांतराने त्या अडगळीत पडतात.
मित्तल असेही म्हणाले की, गरिबांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या पाहिजेत जेणेकरून ते देखील विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतील आणि मूलभूत गरजांची चिंता न करता विकास करू शकतील. मात्र सतत काही ना काही फुकट देण्याच्या घोषणा करून मते मिळवणे हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा सरकारच्या प्राधान्यक्रमात असता कामा नये.
लोकांना योग्य वातावरण देऊन विकासाची संधी दिली पाहिजे, असे ते म्हणाले. जर त्यांना प्रत्येक स्तरावर शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि आरोग्यावर मोठ्या प्रमाणात खर्चाचा बोजा नसेल तर ते स्वतःचा विकास करू शकतात आणि प्रत्येक सुख-सुविधा स्वतः मिळवू शकतात. उपचारादरम्यान अनेकवेळा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडते, त्यामुळे लोकांना मोफत आरोग्य सुविधा देण्यास प्रत्येक कल्याणकारी राज्याचे प्राधान्य असायला हवे, असे मित्तल म्हणाले.