पुणे -गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात होणारी हापूसची आवक काहीशी ठप्प झाली आहे. कोकणात तौक्ते चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्याने आंब्यांचा पुरवठा कमी झाला आहे. दोन दिवसांत अवघी 500 पेटी आवक झाली. एरव्ही दररोज तीन ते चार हजार पेट्या इतके हे प्रमाण असते.
सध्या दाखल होत असलेल्या आंब्यांमध्ये वादळाने मार खालेल्या फळाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कमी प्रमाणात हापूस बाजारात दाखल होईल, अशी शक्यता व्यापारी वर्गाच्या वतीने देण्यात आली.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड परिसरातून हापूसची आवक होते. येथील बहुतांश भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यामध्ये आंबा बागांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा जारी केल्यानंतर ज्यांच्या आंब्याला पाड लागला आहे, त्यांनी त्यांचा आंबा शेडमध्ये उतरवला. तो बाजारात उशिराने दाखल झाला. तर, काहींचा आंबा झाडावरच राहिल्याने त्याला फटका बसणार आहे.
चक्रीवादळामुळे वाहतूक ठप्प आहे. तर, बहुतांश ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत. या सर्वांचा परिणाम मार्केटयार्डातील हापूसच्या आवकेवर झाल्याचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.
तर, चक्रीवादळामुळे झालेल्या पावसाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. त्यामुळे, येत्या काळात पावसाचा मार बसलेला हापूस मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होईल. हापूसचा हंगाम 10 ते 20 जूनपर्यंत राहिल, अशी शक्यता होती.
मात्र, चक्रीदावादळामुळे हा हंगाम 25 मेपर्यंत राहील असा अंदाज आहे. दरम्यान, सोमवारी (दि. 17) येथील बाजारात 4 ते 7 डझनाच्या कच्च्या हापूसची 1,000 ते 1,500 रुपये तर तयार हापूसची 1,200 ते 3 हजार रुपयांपर्यंत विक्री झाल्याचे काची यांनी नमूद केले. दरम्यान, पावसामुळे ग्राहकांनी हापूस खरेदीकडे पाठ फिरवली आहे.