पारगाव पेठ येथे शेतातील मातीही शिल्लक नाही
मंचर (प्रतिनिधी) – पारगाव (पेठ, ता. आंबेगाव) येथील शेतकरी म्हातारबा लक्ष्मण घुले यांच्या शेतातील कांदा व शाळू पीक व शेतातील माती अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. वाहून गेलेल्या शेती पिकाची व शेताचा पंचनामा करुन नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी म्हातारबा घुले यांनी केली आहे.
पारगाव येथील शेतकरी म्हातारबा घुले यांची शेती डोंगराच्या बाजूला असल्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतात पाणी शिरले. पावसाच्या पाण्याच्या लोटात शेताचे बांध फुटून शेतात असलेला 5 एकर शाळू व दीड एकर लावलेले कांदा रोप वाहून गेले.तसेच बांध फुटल्याने शेतातील माती वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.