शेतकऱ्यांची स्वप्ने “पाण्यात’ : महसूल आणि कृषी विभागाकडून तातडीने पंचनामे सुरू
शिक्रापूर (वार्ताहर) – सध्या महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचले आहे. पिके जास्त पाण्यामुळे सडली आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास वाया जाऊन शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळू लागली आहेत. शिक्रापूर परिसरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शिक्रापूर येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलेले असल्यामुळे शेतातील उभी पिके जळून जात आहे. ही जळून जाणारी पिके पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शिक्रापूरसह परिसरातील जातेगाव, पिंपळे जगताप, कासारी, तळेगाव ढमढेरे, केंदूर, करंदी, बुरुंजवाडी यांसह आदी भागातील शेतामध्ये असलेले ऊस, बाजरी यांसह शेपू, कोथंबीर, वांगे आदी पिके जळून जात आहेत.
शेतामध्ये साचलेले पाणी पुढील काही काळ राहणार आहे. त्यामुळे पाऊस पडूनही शेतकऱ्यांच्या नशिबी नापिकी आली आहे. यापुढील काळामध्ये मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, यांसह बॅंकांचे कर्ज फेडायचे कसे आणि पुढे शेती करायची कशी, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यापूर्वी शेतातील पिकांना पाणी नसल्यामुळे पिके जळून जात होती. परंतु यावर्षी पाण्यामुळे पिके जळून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनाने लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी सिकंदर शेख म्हणाले की, सध्याच्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांमधून उत्पन्न काहीही मिळत नाही. पिके सडून जात आहेत. त्यामुळे मशागत, लागवडीसाठी केलेला खर्च यातून उत्पन्नाची अपेक्षा असताना उत्पन्न काहीच नाही. परंतु नुकसान होत आहे.
शिक्रापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी करताना पिकांचे पंचनामे करण्यास वेळ लागत आहे. शेतकऱ्यांनी समूहाने पंचनामे केल्यास जास्त शेतकऱ्यांचे पंचनामे होतील. परंतु कोणतेही शेतकरी पंचनाम्यांपासून व नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाहीत.
-अशोक जाधव, सहायक कृषी अधिकारी, शिरूर.