अकोले -प्रवाशी वाहतूक करणारी लालपरी(एसटी) कांदा वाहतुकीला वापर करण्याचा अभिनव प्रयोग अकोले आगाराने राबवला आहे. राज्यात हा पहिला उपक्रम ठरण्याची शक्यता आहे. शेतीमालासाठी अकोले आगाराची बस सेवा सुरू करण्याच्या धोरणाचे शेतकऱ्यांकडून स्वागत केले.
अकोले एसटी आगाराने काल दुपारी 4 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीतून साडेबारा टन कांदा व भाजीपाला घेऊन वाशी येथे मालवाहतूक बस सोडण्याचा श्रीगणेशा केला. यापुढे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तेथून त्याचा शेतीमाल तो म्हणेल त्या ठिकाणी नेला जाईल, अशी माहिती अकोले आगारप्रमुख ज्ञानेश्वर आव्हाड यांनी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बस सेवा ठप्प झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर अकोले आगाराने अकोले-राजूर, अकोले-कोतूळ, अकोले-संगमनेर अशी प्रवाशी सेवा सुरू केली होती. पण जागरूक बनलेल्या नागरिकांनी या सेवेकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यानंतर मालवाहतूक या पर्यायाकडे अकोले आगाराने आपले नशीब अजमावणारे पाऊल टाकले आहे.
अकोले आगाराची पहिली बस (एम एच- 14 इ एफ 6285) ही सचिन उगले या व्यापाऱ्याची पहिली साडेबारा टन कांदा गोण्या व भाजीपाला घेऊन वाशी येथे रवाना झाली. बस सोबत दोन चालक लक्ष्मण मेंगाळ, तान्हाजी मेंगाळ हे दोघे चक्रधर म्हणून होते. त्यासोबत व्यापारीही आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती अकोलेमधून ही बस कांद्याने भरून निघाली. तेव्हा उत्साहाचा माहोल होता.
अकोले आगाराने मालवाहतुकीचा शुभारंभ केला असून अकोले तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला व इतर शेतमालसाठी वाहतुकीसाठी संपर्क केल्यास त्यांना तातडीने सेवा दिली जाईल. त्यात फक्त नाशवंत व अमली पदार्थ सोडून कोणतेही साहित्य हवे त्या ठिकाणी पोहचवले जाणार असून 45 रूपये किलोमीटरप्रमाणे कमी अंतरासाठी घेतले जाणार आहे. या कांद्यासाठी 1100 रुपये टनांप्रमाणे भाडे आकारले जाणार आहे. अकोले व्यापारी संघटनेने यासाठी मोलाचे सहकार्य केले, असे आगारप्रमुख आव्हाड यांनी सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न समितीचे सभापती पर्बतराव नाईकवाडी, सचिव अरुण आभाळे, व्यापारी लालूशेठ दळवी, भारत मुंगसे, पठाण, वाहतूक नियंत्रक अशोक कडलग, वाहतूक निरीक्षक.गंभीरे, सचिन वाकचौरे, अशोक फापाळे, विलास मालुंजकर आदींसह शेतकरी उपस्थित होते. या मालवाहतूक बससेवेमुळे शेतकऱ्यांचा शेती माल मुंबई येथे पाठविण्यास सुलभ झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.