विवेकानंद काटमोरे
पुणे – ‘राजकारणात कधीही कोणी संपत नसतं’ हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेलं निरीक्षण आहे. संपण्याच्या, व संपवण्याच्या, वल्गना कायम विरोधी बाजूंनी एकमेकांवर केल्या जातात. पण त्यात राजकीय अभिनिवेश वगळता फार काही तथ्य असतं असं नाही.
असं असलं तरीही, काही निवडणुका या कारकीर्दी, घडवणा-या वा बिघडवणा-या असतात.
त्यांच्या निकालांचा परिणाम पुढचा काही काळ या कारकीर्दींचं जे राजकारण असतं, त्याला एक तर उंचीवर नेऊन ठेवणारा असतो किंवा अगदी काही काळ मागे नेणारा. त्या निकालानं काहींची कारकीर्द झळाळून निघते, तर काहींची कारकीर्द झाकोळते.अशीच काहीशी परिस्थिती शिरूर लोकसभेच्या हडपसर विधानसभा मतदार संघातील आजी-माजी आमदारांसह, पदाधिकाऱ्यांची असणार आहे.
लोकसभेची चालू असलेली निवडणूक देशाची असली, तरीही शिरूर लोकसभा आणि त्यातील हडपसर विधानसभेतील दिग्गज नेत्यांना ती अनेक वैयक्तिक कारकीर्दींसाठी निर्णायक ठरणारी झाली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून कमालीची रस्सीखेच पाहायला मिळाली. हिवेदावे, आरोप प्रत्यारोप झाले. घड्याळ व तुतारी चिन्हांसाठी जास्तीत जास्त मतदान कसे पडेल याकडे लक्ष केंद्रित केले होते. आता आपलाच उमेदवार विजयी होणार, अशी खात्री असल्याने यासाठी हडपसर विधानसभेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत.
तर या विधानसभा मतदार संघातील मताधिक्य आणि विजयावर आगामी विधानसभा उमेदवाराचे गणित ठरणार आहे.लोकसभेच्या निवडणुकीत शिरूर मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघात खासदार डॉ .अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील अशी सरळ दुरंगी लढत झाली आहे. थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी काट्याची टक्कर निवडणूक झाली आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात यासाठी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराची धुरा महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे पाटील ,भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश घुले,शिवसेना शहर प्रमुख व माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे,मनसेचे प्रमुख साईनाथ बाबर,आरपीआयचे अध्यक्ष महादेव दंदी ,राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी धुरा सांभाळत होते.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक बंडू गायकवाड,योगेश ससाणे, विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे, नमेश बाबर व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली.
दोन्ही पक्षाच्या व उमेदवारांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारसंघातून किमान ५० हजारांचे मताधिक्य असेल ,असा दावा केला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना, मनसेसह इतर पक्षांची जोड मिळाली, तर दुसऱ्या बाजूला डॉ. अमोल कोल्हे यांना पंतप्रधान मोदी विरोधी लाट, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी सहानभूती मिळणार आहे.यात आपही सोबत राहिले आहे. देशाची सुरक्षितता ,देशाचा विकास यासाठी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी ‘घड्याळा’ स मतदान करण्याचे आवाहन आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर करत होते.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घड्याळाचा प्रचार जोमाने केला, असे भाजप मंडल अध्यक्ष संदीप दळवीचे म्हणणे आहे. तर, महायुतीकडून आढळराव पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच मतदारसंघात भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते. ते मतदारांनीही मतदानातून दाखवले आहे, असा दावा भाजपचे माजी नगरसेवक मारुती तुपे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष निधीतून मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे आणली आहेत. त्यामुळे विधानसभेत आढळराव पाटलांना आम्ही मताधिक्य देऊ, असा दावा शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी केला आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांची फळी मोठी होती ,ती आढळराव पाटलांसाठी सक्षमपणे प्रचारात होती. याउलट डॉ. कोल्हे यांचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे नवीन चिन्ह पोचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या महादेव बाबर ,बाळासाहेब शिवरकर, प्रशांत जगताप, निलेश मगर ,प्रवीण तुपे यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी मोठे कष्ट घेतलेले दिसून आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची येथे स्वतंत्र ताकद आहे .त्यांनी मोठ्या संख्येने डॉ. कोल्हे यांच्या प्रचारात उतरून शिवसेनेच्या मतदार यांसह अन्य मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणा शेवटपर्यंत कार्यरत होती, असे विजय देशमुख ,समीर तुपे ,संगीता ठोसर,राजेंद्र बाबर ,तानाजी लोणकर, प्राची अल्हाट,शंकर घुले ,दिलीप व्यवहारे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत काँग्रेसची ताकद मोठी आहे . याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांना मानणारा मोठा वर्ग मतदार संघात आहे. त्यामुळे डॉ. कोल्हे यांना मोठी ताकद मिळाली आहे, असे काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिलीप तुपे यांचे म्हणणे आहे . तर मतदारसंघातून मोठे मताधिक्य हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळेल, असा दावा काँग्रेसचे प्रशांत सुरसे यांनी केला आहे.
शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत उमेदवारी मिळविलेले उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरेपर्यंत महायुतीच्या नेत्यांमध्ये काही संभ्रम होता .तो उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मावळला आणि याच नेत्यांमध्ये एकी प्रकर्षाने जाणवली, टोकाचे मतभेद विसरून नेते एक दिलाने कामाला लागले होते.
तर दुसरीकडे शरद पवार व उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी मतदारांना साथ घातल्याने पदाधिकारी व नेते आणि मतदार अशी ही निवडणूक विभागली गेल्याचे जाणवले. मतदारांनी घेतलेला निर्णय मतमोजणीनंतर समोर येईलच आणि याच निकालातून आगामी विधानसभेचा उमेदवार हा ही स्पष्ट होईल, अशीच चर्चा हडपसर विधानसभा मतदारसंघात रंगू लागली आहे.
शिरूर लोकसभेसाठी उमेदवाराचा विजय तसेच विधानसभा मतदारसंघातून उमेदवाराला मिळालेले मताधिक्य हे या मतदारसंघातील आमदार चेतन तुपे पाटील ,माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर ,माजी आमदार योगेश टिळेकर ,माजी आमदार महादेव बाबर ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,शिवसेना शहर प्रमुख (शिंदे गट) प्रमोदनाना भानगिरे यांचे आगामी राजकीय भवितव्य ठरणारा असणार आहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.