कोल्हापूर (प्रतिनिधी) – कांद्याच्या भाववाढीवर सरकारकडून नियंत्रण आणण्यासाठी आणि कांद्याचा पुरवठा होण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्यात येत आहे. या कांदा आयातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा विरोध दर्शविला आहे. मोदी सरकारचा हा आत्मघातकी निर्णय आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
राजू शेट्टी म्हणाले, कांद्याचे दर वाढून 2 महिने झाले आहेत, मग सरकारने आत्ताच का कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला? असा सवाल उपस्थित करत सरकारचा हा निर्णय आत्मघातकी असल्याचे त्यांनी म्हटल आहे.
तुर्कस्तानमधून 11 हजार टन कांदा आयात केल्यानंतर बाजारपेठेत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळतील. आता कुठे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा चांगला पैसा मिळत होता. त्याचवेळी केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड तोटा होणार आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत.