पुणे – कांद्याचा साठा मुबलक असून आवकही नियमित होत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव स्थिर राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर, अपेक्षित भाव मिळत नसल्याने सध्या शेतकरी कांद्याची साठवणूक करत आहेत.
सध्या घाऊक बाजारात कांद्याला प्रतवारीनुसार 15 ते 18 रुपये किलो असा भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात 25 ते 30 रुपये भावाने विक्री केली जात आहे. अतिवृष्टी झाल्यास नवीन कांदा लागवडीवर परिणाम होऊ शकतो. सध्या कांद्याची आवक नियमित होत आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.
गेल्या वर्षी नवीन कांदा लागवडीला पावसाचा फटका बसला होता. जुन्या कांद्याचा साठा संपला होता. बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपये किलो असा उच्चांकी दर कांद्याला मिळाला होता. यंदा एप्रिलमध्ये करोना संसर्गामुळे निर्बंध लागू होते. त्यामुळे उपाहारगृह आणि खाणावळचालकांकडून कांद्याला असलेली मागणी एकदम कमी झाली. विवाह समारंभ पुढे ढकलल्याने कांद्याला मागणी कमी राहिली. सध्या कांद्याला अपेक्षित दर नाहीत. त्यामुळे शेतऱ्यांनी कांदा साठवणुकीवर भर दिला आहे.
सध्या बाजारात दररोज कांद्याची आवक नियमित होत असून कांदा भाव स्थिर राहणार आहे. दरम्यान शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. साठवणुकीतील जुन्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम होत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 30 ते 40 गाड्यांमधून कांद्याची आवक होत आहे.