अरणीत कांदा साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची धावपळ
मंचर – सद्यःस्थितीत उन्हाळी कांदा काढणी आंबेगाव तालुक्यात प्रगतीपथावर आहे. कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने कांदा साठवणुकीच्या कामात शेतकरी व्यस्त आहे. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला बाजारभाव नसल्याने कांदा काढून बराकीमध्ये साठवून ठेवावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढल्यानंतर थेट बाजारात विकण्याचे नियोजन केले होते; परंतु आता किलोला पाच ते सहा रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत असल्याने काही शेतकऱ्यांनी आपल्या कांदाचाळीमध्ये कांदा भरून ठेवला आहे, तर काही शेतकरी तात्पुरत्या स्वरुपात कांदाचाळी तयार करत आहे.
दुसरीकडे शेतकऱ्यांकडून मातीमोल किमतीमध्ये खरेदी केलेला कांदा चाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत प्रतीकिलो विक्री केली जाते. यामध्ये व्यापारी वर्ग भरमसाठ नफा कमावत आहेत.त्यांच्यावर कोणाचेही नियत्रंण नाही. करोनोच्या संकटामुळे शेतकऱ्यांचा शेतीमालाचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा स्थितीत सरकारने कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.