रखडलेले पंचनामे, रस्ते दुरूस्तीवर होणार वादळी चर्चा
सातारा – यशवंत विचारांचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेची शुक्रवार, दि. 15 रोजी होणारी सभा वादळी होणार आहे. अतिवृष्टीमुळे तब्बल चौदाशे किलोमीटरचे रस्ते उखडल्याने डीपीडीसीच्या तिजोरीवर चांगलाच ताण पडणार आहे. जिल्ह्यातील नादुरुस्त रस्त्यांचे पडसाद झेडपी सभेत उमटण्याची दाट चिन्हे आहेत.
सातारा जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाचा मुक्काम 44 दिवस वाढला. त्यामुळे अतिवृष्टीने वाहून गेलेले फरशी पूल, साकव उखडलेली खडी यामुळे जिल्हा परिषदेच्या ताब्यातील 2330 किलोमीटर रस्त्यांपैकी एकूण 1423 किलोमीटर रस्ते पूर्णतः खराब झाल्याचा अहवाल बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या हद्दीत ग्रामीण मार्ग 7120 किलोमीटरचे तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 1835 किलोमीटरचे रस्ते आहेत.
यंदा सातारा जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद सेस फंड, लोकप्रतिनिधींचा निधी, याशिवाय ग्रामसडक किंवा पंतप्रधान सडक योजनांमधून निधी उपलब्ध केला जातो. 2018 मध्ये जिल्हा नियोजन समितीतून रस्ते दुरुस्तीसाठी दोन टप्प्यात साडेसात कोटी रुपये खर्ची टाकण्यात आले होते. मात्र जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे चौदाशे किलोमीटर रस्त्यांची दैना झाल्याने यंदाचे रस्ते दुरुस्तीसाठी वीस टक्के जादा निधीची सूचना करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी सातारा जिल्हा परिषदेची सभा होणार असून पिकांच्या नुकसानीचे रखडलेले पंचनामे व रस्ते दुरूस्ती या दोन विषयावर सत्ताधारी राष्ट्रवादीला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेडपीची सभा वादळी होण्याची चिन्हे आहेत.