अभिषेक भालेकर
टाकळी ढोकेश्वर – पारनेर तालुक्यातील उत्तर भागात मूग, राजमा, वाटाणा पिकाचा हंगाम संपला असून, बाजरी काढणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे आता कांदा लागवडीस वेग आला आहे.
पारनेर तालुक्यात यंदा सर्वत्र पावसाने मोठा दिलासा दिला आहे. मांडओहळ धरणासह परिसरातील काळू, तिखोल, ढोकी नं.1, ढोकी नं.2, पळशी, मांडवा, भाळवणीसह सर्वत्रच पाझर तलावांसह नाले, केटीवेअर, विहिरी तुडुंब भरले असल्यामुळे रब्बी हंगामातील पिके तरी हातात पडतील, अशी शेतकऱ्यांत आशा पल्लवीत झाली आहे. पारनेर तालुक्यात मागील वर्षी 22 हजार 170 हेक्टर कांदा लागवड झाली होती. यंदा खरिपामध्ये 4 हजार हेक्टर कांदा लागवड झाली असून, या रब्बी हंगामामध्ये सरासरी 17 हजार हेक्टर लागवड होवू शकते.
रब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, वाटाणा व सरासरी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. गावराण कांद्याचे बी सरासरी 2 हजार 500 ते 4 चार हजार रुपयांना मिळत आहे. एकरी अडीच ते तीन किलो बियाणे लागते. एक एकर कांदा लागवडीसाठी शेतकरी 20 ते 25 हजार रुपये पायली कांदा रोपासाठी पैसे मोजत आहेत. एकरी कांदा लागवडसाठी जवळपास 72 ते 75 हजार रुपये खर्च लागत आहे.
आज मितीस टाकळी ढोकेश्वर, तिखोल, काकणेवाडी, कर्जुलेहर्या, पोखरी, गुरेवाडी, वासुंदे, वडगाव सावताळ, वनकुटे, पळशी, खडकवाडी, वारणवाडी, मांडवे, भाळवणी आदी ठिकाणी रब्बी हंगामासाठी शेतीच्या मशागतीला वेग आला असून, कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, शेतकऱ्याच्या पदरात बाजरी सोडून काहीच पडले नाही. वाटाणा, मूग व राजमा ही तीनही पिके पावसामुळे वाया गेली. त्यामुळे रब्बी हंगामात तरी कांद्याचे दोन पैसे मिळतील, या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड सुरू केली आहे.