राहू, (वार्ताहर)- नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. तसतसे त्यातील मर्यादा व तोटे देखील अधोरेखित होत असल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये सर्वसामान्य ते उच्च शिक्षित देखील फसविले जात आहेत. असाच एक प्रकार राहू येथे घडला आहे. एका ओटीपीने सत्तर हजारांचा खिसा रिकामा केला आहे. सायबर क्राइममधील हा प्रकार आता गावापातळीवरही पोहोचला आहे.
पुण्यातील एका नामांकित दवाखान्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्यासाठी जस्ट डायलवरून संपर्क क्रमांक घेतला. त्यावर कॉल केल्यानंतर संबंधित व्यक्तीने तो ओटीपी मागितला, राहू येथील राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या खात्यावरुन 45 हजार दोनशे रुपये गेले.
त्यानंतरही दवाखान्याची अपॉइंटमेंट कन्फर्म झाली नाही, असे सांगण्यात आल्याने संबंधित व्यक्तीने तो मेसेज आपल्या मित्राला ऑनलाइन अपार्टमेंट घेण्यासाठी पाठवला. मित्रांनेही पुन्हा ओटीपी दिल्यानंतर त्याच्याही खात्यावरूनही पंचवीस हजार दोनशे रुपये गेले असल्याचा प्रकार घडला आहे.
डिजिटल व्यवहारात भामटे तरबेज
एकीकडे केंद्र सरकार डिजिटल व्यवहार व्हावेत म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकारे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. खात्यावरून पैसे गेल्यानंतर बँक तसेच पोलीस यंत्रणा कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यावर बँकेकडे विचारले असता तुम्ही अगोदर पोलिसांकडे तक्रार द्या. नंतर आम्ही दखल घेऊ, असे सांगितले जाते. पोलीसही याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. सायबर क्राईम विभागाकडे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, यात नागरिकांना दिलासा मात्र मिळत असल्याची एकंदरीत परिस्थिती आहे.