राहू, {भाऊ ठाकूर} – दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील शेवटचे टोक असलेल्या टाकळी भीमा व पाटेठाण ही गावे दुष्काळ निधीपासून मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दौंड तालुक्यात पाऊस कमी पडल्याने काही प्रमाणात दिलासा म्हणून दुष्काळ निधी देण्याचे जाहीर केले आहे.
त्यासाठी अर्ज तलाठी किंवा कृषी विभागाकडे अर्ज करण्याची व्यवस्था होती. परंतु महिनाभरापासून पाटेठाण व टाकळी या गावांसाठी कायमस्वरुपी तलाठीही मिळू शकले नाहीत. पाटेठाण, टाकळी ही गावे प्रशासनाच्या दिरंगाईची बळी ठरली आहेत.
दुष्काळ निधीसाठी केलेले अर्ज हे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन छाननी होऊन अर्जाला एक विशिष्ट क्रमांक मिळतो. त्या क्रमांकावर केवायसी करणे गरजेचे असते. जेणेकरून दुष्काळ निधी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होईल. परंतु या बाबतीत पाटेठाण, टाकळी ही गावे प्रशासनाच्या दिरंगाईची बळी ठरण्याची शक्यता आहे.
गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळापासून पाटेठाण व टाकळी या गावांसाठी कायमस्वरुपी तलाठीही मिळू शकले नाहीत. कधी हा चार्ज शेजारी असलेल्या वडगाव बांडे गावाच्या तलाठी यांच्याकडे तात्पुरता दिला जातो. लगेच रद्द करून रिकामा ठेवला जातो. कधी पूर्वी अशी असलेल्या संबंधित तलाठी यांना दिला जातो. परंतु त्यांना तांत्रिक अडचणीमुळे काम करता येत नाही. परंतु याचा परिणाम हा थेट शेतकरयांना भोगावा लागत आहे. कारण शेतकऱ्यांचे अर्ज जर प्रशासनाकडे पोहोचले नाहीत तर दुष्काळ निधी कसा मिळणार, याची चिंता सतावत आहे.
पाटेठाण व टाकळीच्या शेतकऱ्यांना कोणी वालीच राहिला नाही, अशी परिस्थिती आहे. या संदर्भात दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. दोन्ही गावचे शेतकरी हे दुष्काळ निधिला मुकणार आहेत. त्यामुळे यावर काहीतरी तोडगा निघणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना कर्जासाठी हेलपाटे
नुकतेच आर्थिक वर्ष संपल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कर्ज बाकी भरली आहेत. नवीन कर्ज काढण्यासाठी सोसायटीला ई – करार पत्र करून देणे गरजेचे असते. याची नोंद तलाठी करीत असतात. परंतु दौंड महसूल प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे तलाठी हे कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना ई – करार पत्र नोंदविताच येत नाही.
त्यामुळे शेतकऱ्याला कर्जाला मुकण्याची वेळ आली आहे. अधीच दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना शेतकऱ्याला कर्ज देखील वेळेत मिळणे अवघड झाले आहे.आम्ही अनेकांनी अर्ज भरून दिलेला आहे. परंतु अजूनही यादी आमच्यापर्यंत आलेली नाही.
केवायसीसंदर्भात कोणती माहिती मिळालेली नाही. आमच्या शेजारच्या गावातील अनेक नागरिक हे केवायसीसाठी गर्दी करीत आहेत. परंतु आमचा देखील हक्क असताना आम्हाला या निधीला मुकावे लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. – रवींद्र नरसाळे, शेतकरी, टाकळी भीमा.