नेहरूनगर, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरवासीयांचे जीवन सुखकर व निरोगी बनण्यासाठी ठिकठिकाणी उद्याने, क्रीडा मैदाने, जलतरण तलाव आदींची योजना केली आहे. परंंतु महापालिकेने मोरवाडी येथे संत ज्ञानेश्वर उद्यान नागरिकांसाठी विकसित केले आहे.
परंतु याच्या देखभाल दुरुस्तीकडे व स्वच्छतेकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. उद्यानाची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोरवाडी परिसरातील नागरिकांसाठी संत ज्ञानेश्वर उद्यान एक आधार आहे. या उद्यानात ज्येष्ठ नागरिक, तरुण-तरुणी, लहान मुले यांचा वावर मोठा आहे. परंतु उद्यानाची नियमित साफसफाई होत नसल्याने पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणावर राडारोडा, कचरा तसेच पालापाचोळा जमा झाला आहे. याकडे उद्यान विभाग दुर्लक्ष करत असल्याने उद्यानात फिरण्यासाठी येणार्या नागरिकांना अडथळ्यांचा समाना करावा लागत आहे.
‘वॉकिंग ट्रॅक’वर पालापाचोळ्याचे ढीग पडलेले असल्याने ज्येष्ठ नागरिकांना चालताना झाडांच्या पानावरून पाय घसरून पडण्याची भीती वाटत आहे. बर्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या वाढलेल्या दिसत आहेत. लहान मुलांसाठी जी खेळणी बसविली आहेत त्यावर तरुण-तरुणी बसून गप्पा मारताना दिसत आहेत.
उद्यान विभागाकडून येथे 24 तास सुरक्षा रक्षक नियुक्त करणे गरजेचे आहे. परंतु सुरक्षारक्षक नसल्याने अनेक अवैध प्रकार येथे चालत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
मोरवाडी परिसरात नागरिक तसेच दुकानांमधील कर्मचारी जेवण करण्यासाठी येथे येतात. परंतु जेवण केल्यानंतर प्लॅस्टिक पिशव्या, पत्रावळी, खरकाटे इतरत्र फेकून निघून जात आहेत. त्यामुळे उद्यानाच्या सौंदर्यास बाधा येत आहे.
मद्यपींचा अड्डा
उद्यानाला सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी मद्यपी येथे दारू पित बसलेले असतात. उद्यानाचा मुख्य दरवाजा बंद केल्यानंतर आता जात येत नाही म्हणून काही टवाळखोरांनी चक्क उद्यानाची भिंत फोडली आहे. त्यामुळे रात्री उद्यान मद्यपींचा अड्डा बनत आहे.
शहरातील उद्यानासाठी महापालिकेने वेळ ठरवून दिली आहे. परंतु येथे सुरक्षारक्षक व देखभाल करण्यासाठी कोणीच उपस्थित नसल्याने दिवसभर तरुण-तरुणींचा येथे राबता असतो. त्यामुळे आजूबाजूच्या सोसायटीमधील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.
लहान मुलांची उद्यानाकडे पाठ
उद्यानामध्ये टवाळखोरांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी दारू पिऊन मोकळ्या बॉटल उद्यानात सर्वत्र दिसून येतात. टवाळखोर मुले दिवसभर अर्वाच्य भाषेत ऐकमेकांना शिवीगाळ करत असतात. लहान मुलांच्या खेळण्यावर बसून राहतात. लहान मुलांना व्यवस्थित बोलत नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांवर वाइट संस्कार होऊ नयेत म्हणून नागरिक व लहान मुलांनी उद्यानाकडे पाठ फिरवली आहे.
उद्यानात सर्वत्र कचरा आहे. उद्यानात ठिकठिकाणी दारुच्या बॉटल दिसून येतात. टवाळखोर एकमेकांना शिवीगाळ करतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांनी उद्यानात यावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. उद्यानाची शिस्त मोडणारांवर दंडात्मक कारवाई करावी.
– स्थानिक नागरिक.