नगर – पाणीपुरी खात असताना माझ्याकडे रागाने का पाहतोस अशी विचारणा केल्याच्या व पूर्ववैमनस्याच्या कारणावरून मनात राग धरून आठ ते नऊ जणाच्या जमावाने शिवीगाळ दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.31) रात्री दहा वाजता नगर-पुणे महामार्गावर केडगाव येथील देवीचौकात घडली.
याबाबत माहिती अशी की, सुंदर आसाराम पांढरे (वय 25, रा. मोहिनीनगर, केडगाव) हा त्याचा मित्र अमित भांड याच्या बरोबर झेंडा चौक येथे हातगाडीवर पाणीपुरी खात असताना तेथे दिनेश उर्फ शंकर भाऊसाहेब कोतकर हा तेथे आला व त्याने पांढरे याच्याकडे रागाने पहिले यावर पांढरे याने माझ्याकडे रागाने का पाहतोस? असे विचारले. त्याचा राग येवून दिनेश याने तू मैदानात भेट तुझे हाडेच मोडतो’ असे म्हणून बाचाबाची करून निघून गेला. त्यानंतर त्याने थोड्यावेळाने पांढरे यास फोन करून मी बायजाबाई मंदिराजवळ आहे, तू येथे किती वेळात येतो ते सांग’ असे म्हणाला. त्यावर पांढरे याने तेथे जाण्यास नकार दिला. त्यानंतर पांढरे हा केडगाव देवीचौकात आला त्यानंतर तेथे अजित कोतकर, अक्षय उर्फ बहिरू कोतकर तेथे आले. त्यांच्या पाठोपाठ बाळासाहेब काशिनाथ कोतकर व निलेश कोतकर तेथे आले. त्यांनी अन्य पाच ते सहा जणांना बोलावून घेतले आणि त्यांनी पांढरे यास लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.