राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील पीएमआरडीएच्या विविध प्रकारची टाकण्यात आलेल्या आरक्षणावर हरकती आणि सूचना राजगुरुनगर येथे तहसीलदार कार्यालयात स्विकारण्यात येत आहे.
राजगुरूनगर येथे आतापर्यंत दीड हजार हरकती प्राप्त झाल्यापासून ऑनलाइन व औंध येथील कार्यालयातही नागरिकांनी हरकती अर्ज दाखल केले आहेत.
15 सप्टेबरपर्यंत हरकती आणि सूचना स्विकरण्यात येणार आहेत. खेड तालुक्यातील जवळपास 104 गावांच्या पीएमआरडीएत समावेश आहे. या गावातील अनेक जमिनीवर भविष्यात होणाऱ्या लोकसंख्येच्या विचाराअंती विविध विकासकामांची आरक्षणे टाकण्यात आली.
सुरुवातीला गावनिहाय आरक्षणाचे नकाशे प्रसिद्ध करण्यात आल्याने नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. जमिनीवर टाकण्यात आलेल्या आरक्षणामुळे जमीनमालकांनी विरोध केला. या आरक्षणावर औंध येथील कार्यालयात हरकती आणि सूचना स्विकारण्यात येऊ लागल्याने नागरिकांची या विरोधात तक्रारीसाठी गर्दी होऊ लागली होती.
अखेर तालुकापातळीवर हरकती घेण्याबाबत पीएमआरडीएने कार्यालयीन कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि हेलपाटे वाचले आहेत.
खेड तहसीलदार कार्यालयात 24 ऑगस्टपासून टाकण्यात आरक्षणाविरोधात हरकती आणि सूचना स्वीकारण्याचे काम सुरु झाले.
आतापर्यंत जवळपास दीड हजार हरकती आल्याची माहिती पीएमआरडीएचे कर्मचारी गणेश म्हस्के यांनी दिली. एकूण प्राप्त झालेल्या तक्रारींवर सुनावणी होऊन संबंधित तक्रारदार यांना नोटीस दिली जाऊन तारीख कळवली जाणार आहे.
याबाबत तक्रारदार नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रमावस्था दिसून येत आहे. मागवण्यात आलेल्या तक्रारीबाबत प्रत्येक गावनिहाय सुनावणी प्राप्त तक्रारीच्या संख्येनुसार घेण्यात यावी, अशी मागणी आरक्षणबाधित नागरीकांनी केली आहे.