शिरूर- राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पोलीस खात्यावर कुठलेही नियंत्रण मार्गदर्शन व दिशा नसल्यामुळे राज्यात अराजकता माजली आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी व महिलांवरील अत्याचार शिगेला पोहोचले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरूर येथील पत्रकार परिषदेत केला.
मुंबई येथे महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचारातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.राज्यामध्ये गुन्हेगारी व महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असून, राज्यात व तसेच पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात याचा उद्रेक झाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री याच जिल्ह्यातील असून आपण कोठे कमी पडलो, गुन्हे का वाढतात, महिलांवरील अत्याचार कसे वाढतात, याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत कठोर कारवाई व उपायोजना हे सरकार करत नसून वाढत्या गुन्हेगारीला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
राज्यातील पत्रकारांना फ्रंट लाईन वर करता दर्जा द्यावा व 50 लाखाचे विमा कवच त्यांनाही इतरांप्रमाणे द्यावी अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने मांडली आहे; परंतु याबाबत महाविकास आघाडी सरकार गंभीर नसल्याचे दरेकर यांनी सांगितले. राज्यात वाढती महागाई कमी करण्या बाबत राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ओबीसी आरक्षणाविषीची भूमिका अनाकलनीय
ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारची भूमिका नक्की कळत नाही. जोपर्यंत ओबीसी आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला, असा निर्णय सर्वपक्षीय झाला.
त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते; परंतु त्याअगोदर सर्वोच्चच न्यायालयाचा निर्णय आला. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आपल्या अधिकारात आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. परंतु त्यासाठी सरकारची प्रामाणिक भावना असणे गरजेचे आहे. तात्काळ सरकारने ओबीसी आरक्षण सुरू करावे. त्यासाठी जे करावे लागेल ते करावे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. हे केले नाही तर ओबीसींचा सरकारच्या विरोधात आक्रोश व संताप व्यक्त केला जाईल.
मलिक यांची सीबीआय चौकशी लावा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अनिल देशमुख कुटुंबासोबत आहेत असे सांगितले. मग पोलिसांनी लूकआऊट नोटीस यासाठी दिली, त्यांना नक्की अनिल देशमुख कुठे आहे ते माहिती आहे. आता मलिक यांची सीबीआय चौकशी करून त्यांच्याकडून नक्की अनिल देशमुख कुठे आहे? याची माहिती घ्यावी, असे दरेकर यांनी सांगितले.
त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल बोलू नये. आमच्या नेत्यावर गृहमंत्री असताना गुन्हे दाखल झालेले नाहीत. तुमच्या अनिल देशमुखांवर गृहमंत्री असताना गुन्हे दाखल झालेत. हे लक्षात ठेवा.