सातारा -करोनामुळे एक महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील उद्योग विश्वाचे कंबरडे मोडले आहे. औद्योगिक वसाहतींमधील कंपन्या, लघु व मध्यम उद्योगांना तब्बल दीड हजार कोटीचा तोटा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे उद्योग सुरू करता यावेत म्हणून राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता दिली आहे; परंतु त्यासाठी जाचक नियमावली तयार केली आहे.
कामगारांच्या प्रवासापासून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी, शपथपत्रे सादर करणे, आदी कडक अटी, शर्ती घातल्याने उद्योजकाचा उत्साह मावळला आहे. त्यामुळे उद्योजकांची अवस्था “इकडे आड, तिकडे विहीर’, अशी झाली आहे. सातारा जिल्ह्यात सातारा, केसुर्डी, शिरवळ, तासवडे, फलटण, खंडाळा येथील औद्योगिक वसाहतींमधून तब्बल दोन हजार कोटींची उलाढाल होत होती. मात्र, टाळेबंदी, कामगार संघटनांमधील वाद, पायाभूत सुविधांमधील असमानता यामुळे शिरवळ वगळता जिल्ह्यातील अन्य औद्योगिक वसाहतींचा “क’ दर्जा अद्याप कायम आहे.
साताऱ्याच्या अर्थकारणाला दीड हजार कोटींचा फटका
करोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये तब्बल एक महिना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती बंद आहेत. झारखंड येथील लघुउद्योजकांच्या गटाने सातारा व खंडाळा औद्योगिक वसाहतींची फेब्रुवारी महिन्यात पाहणी करण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला आणखी गती मिळण्याची सुचिन्हे असताना लॉकडाऊनमुळे उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. बोकारो, तुर्भे, नागोठणे, अंबड, भोपाळ, सूरत, बंगळुरू येथून येणारा कच्चा मालही वाहतुकीअभावी पोहोचला नसून त्यात उद्योजकांचे तब्बल सातशे कोटी रुपये अडकून पडले आहेत. शिरवळ व खंडाळा एमआयडीसीमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप आणि त्या आडोशाने बोकाळलेले लेबर कॉन्ट्रॅक्टर यामुळे आधीच उद्योग अडचणीत आले असताना करोनाच्या दुष्टचक्राने या वसाहतींना मंदीच्या खाईत लोटले आहे. शिरवळच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील “ई-पार्क’ बंद असल्याने कामगारांची आबाळ झाली आहे.
सातारा एमआयडीसीचा “क’ वर्ग, उद्योजकांचा वाढता तोटा, याचा राज्य शासनाने अभ्यास करावा. उद्योग सुरू करण्यासाठी लागू केलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणे कार्पोरेट क्षेत्रातील बड्या उद्योगांना शक्य आहे. सातारा जिल्ह्यात 2300 लघु उद्योजक आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी, प्रतिज्ञापत्र व अन्य काही अटींची पूर्तता करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे या अटींचा फेरविचार करावा. काही ठिकाणी कामाचे स्वरूप असे आहे की, तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण आहे.
सुरेंद्र अंबरदार, अध्यक्ष, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा.