कराड (प्रतिनिधी) – पश्चिम महाराष्ट्र हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यावेळी काँग्रेसने कृष्णा खोरे विकास योजना का राबवली नाही? या योजनेची कल्पना मी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे मांडली होती. या ठिकाणी भाजपचा एकही लोकप्रतिनिधी नसताना, त्यांनी हा प्रकल्प उभा केला. या माध्यमातून जिल्ह्यात परिवर्तन झाल्याचे दिसते. मात्र, लोक आपल्यालाच निवडून देतील, अशा अविर्भावात असलेल्या काँग्रेसने सत्ताकाळात उन्माद केला. त्यामुळेच पक्षाची वाताहत झाली, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड दौर्यात पदाधिकार्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, राजेंद्रसिंह यादव, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, भरत पाटील, तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरवळ, खंडाळा, वाई, पाचगणी, महाबळेश्वरपासून भेटीगाठींना सुरुवात केली. सातार्यातील शहरी भाग, कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघात बैठका घेतल्या. दोन दिवसांत कराड दक्षिण आणि पाटण मतदारसंघांचा दौरा करणार आहे. या निवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून, मतदार महायुतीलाच कौल देतील.
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, महायुतीमध्ये आपले नाव अजून का जाहीर झाले नाही, या प्रश्नावर ते म्हणाले, शाहू महाराजांना उमेदवारी दिल्याचे स्वागत आहे. मला अजून दिली नाही, यात वाईट वाटण्याचे कारण नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून, उमेदवार जाहीर करताना स्थानिक विचार घेतला जात आहे. त्यामुळे या प्रक्रियेला उशीर होत आहे; परंतु मी आपल्याशी लोकसभेचा उमेदवार म्हणूनच बोलतोय. सातारा हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू असून, उमेदवारीबाबत लवकरच निर्णय होईल.
महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याबाबत ते म्हणाले, महाविकास आघाडीने कोणाला उमेदवारी द्यायची, हा त्यांचा प्रश्न आहे; परंतु लोकशाहीत कोणाला डोक्यावर घ्यायचे, हे मतदार ठरवतील. मात्र, पंधरा वर्षांमधील त्यांची वाटचाल पाहिल्यास, त्यांची प्रतिमा कळून येते.
राज ठाकरे यांनी मोदींना पाठींबा दिल्याबाबत विचारले असता, ते म्हणाले, मोदींनी चांगले काम केल्यानेच राज ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला आहे. कराडमधील महायुतीच्या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी दांडी मारल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, अशी परिस्थिती नाही. मात्र, कोणाची दांडी कशी उडवायची, हे आम्ही बघतो. मी नेहमी सकारात्मक राजकारण करतो. मी काय करणार, हे जाहीरनाम्यात दिसून येईल.
जरंडेश्वर कारखान्याच्या खाजगीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, शेतकर्यांच्या हितासाठी सहकार चळवळ सुरू झाली; परंतु काँग्रेसने खिरापत वाटल्यासारखी साखर कारखान्यांचे परवाने दिले. गैरव्यवस्थापनामुळे काही सहकारी कारखान्यांचे खाजगीकरण झाले. त्यात जरंडेश्वरच्या समावेश असल्याची खंत वाटते.
…तर आरक्षणाचा प्रश्न उद्भवला नसता
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसेल का, असे विचारले असता, उदयनराजे म्हणाले, देशात काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी जनगणना केली नाही. त्याचा फटका मराठा समाजाला बसला. जनगणना झाली असती, तर आरक्षणाचा प्रश्नच उद्भवला नसता. सर्वांना नोकर्या देणे शक्य नाही; परंतु आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर शैक्षणिक आरक्षण हवे.
कराड शहर व दक्षिणमध्ये चांगला संपर्क
कराड दक्षिणमध्ये आपला संपर्क कमी आहे का, असे विचारले असता, ते म्हणाले, कराड शहर आणि कराड दक्षिणमधील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी माझा चांगला संपर्क आहे. सातार्यात घंटागाडीची संकल्पना मी आणली. ही संकल्पना कराड पालिकेतही राबवली. त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे.
कराड जिल्हा होण्यास विरोध नाही
पूर्वी जिल्ह्यात कराड आणि सातारा हे दोन लोकसभा मतदारसंघ होते. हा मतदारसंघ मोठा आहे. पूर्वीप्रमाणे दोन स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ असायला हवेत. कराड जिल्हा व्हायला हरकत नाही; परंतु तो कशाच्या आधारावर करणार, हे पहावे लागेल.