मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घ्यावा म्हणून पक्षातूनच नव्हे तर राज्यभरातून मागणी करण्यात येत आहे. नवीन अध्यक्ष निवडण्याकरीता नियुक्त करण्यात आलेल्या समितीची उद्या बैठक होणार असून, तेव्हाच नव्या अध्यक्षाचे नाव बहुधा निश्चित करण्यात येणार आहे. पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली. यावर आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, “शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर नेते निराश झाले आहेत. नेते-कार्यकर्ते त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहेत. पण शरद पवार निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. पक्ष पुढे नेण्यासाठी पुढे पाऊलं टाकली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे. शरद पवार अध्यक्ष राहिले तर पक्षातील सर्व घटकांना ते न्याय देऊ शकतील, ते अध्यक्ष नसतील तर आपल्याला या पक्षात न्याय मिळेल का? अशी भावना लोकांची झाली आहे. त्यामुळे ते आम्हाला राजीनामे पाठवत आहेत.”
तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावर आता कोणाची नियुक्ती केली जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यात सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. यावर प्रश्न विचारण्यात आल्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, “मी आजपर्यंत महाराष्ट्रात काम केलेलं आहे. ती सोडून मला दिल्लीतील जबाबदारी स्वीकारता येणार नाही. त्यामुळे मी महाराष्ट्र सोडून दिल्लीत जाणार नाही.”
“मी दिल्लीत काम केलेलं नाही आणि तिथे माझ्या ओळखी नाही. या जबाबदाऱ्या संसदेत काही वर्षे काम केलेल्या व्यक्तीला पार पाडायच्या असतात. शरद पवारांना तो अनुभव असल्याने ते देशभर राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम करू शकले,” अशा पद्धतीने जयंत पाटील यांनी सध्या अध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले.
याशिवाय प्रफुल्ल पटेल यांनी देखील याआधीच पक्षाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे म्हंटले आहे. “मी पक्षाचं अध्यक्षपद घेण्यासाठी तयार नाही. कारण माझ्याकडे आधीपासून खूप काम आहे. माझी अध्यक्ष होण्याची इच्छा नाही,” असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.