मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. पडळकर यांनी पवारांवर टीका करताना, ‘शरदचंद्र पवार यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक् झालो. कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात अन दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात”, म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौऱ्यात आले होते. पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी पुण्यात येत असताना शरद पवार यांनी या मुद्द्यावरून खोचक शब्दांत निशाणा साधत काम झालेलं नसतानाही पुणे मेट्रोचं उद्घाटन होत असल्याची टीका केली होती. याविषयी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, त्यांना पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे पवार साहेब हताशपणे बोलले असतील. आमच्या देवेंद्र फडणवीसांवर त्यांचा राग यामुळेच आहे की माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्र फडणवीसांनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळेच प्रस्थापितांचा तीळपापड होतोय. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत खुपतात, असे पडळकर यांनी म्हटले आहे.
पडळकर यांनी म्हटले आहे की, मी पवार साहेबांना सांगू इच्छितो की फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात भाजपाचे 105 आमदार तर शिवसेनेचे 56 असे एकूण 161 आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात पावसात भिजून सुद्धा फक्त 54 च आमदार निवडून आले. त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडून दिले अशा खोट्या थापा मारू नका, असे पडळकरांनी म्हटले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही. पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या तीस वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असतं, असे आमदार गोपीचंद पडळकरांनी म्हटले आहे.