नवी दिल्ली: राज्यातील सरकार स्थापनेसंदर्भात दिल्लीत महत्वाच्या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. त्या अनुषंगाने भाजप राष्ट्रवादी एकत्र येणार का असे संजय राऊत यांना विचारले असता” तुम्ही ते भाजपलाच विचार असे उत्तर दिले आहे.
यावेळी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, पुढील आठवडाभरात महाराष्ट्रात मजबूत सरकार स्थापन होईल. महाराष्ट्रात अस्थिरता आहे, पंतप्रधानांना चिंता असेल त्यावर कदाचित हे नेते बोलले असतील. केंद्र सरकारही महाराष्ट्राच्या पाठिशी उभं राहिलं. पंतप्रधान हे एका पक्षाचे नाही, तर देशाचे आहेत. हे राज्य निर्माण होईल तेव्हा त्यांना दिल्लीचा आशीर्वाद असेल असं सांगत अमित शहांनी वारंवार मोदींची भेट घ्यावी असही राऊत म्हणाले.
तसेच महाराष्ट्रात १०० टक्के शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली मजबूत सरकार येईल. महत्वाच्या घडामोडींनी वेग घेतला आहे. निर्णय घेतले जात आहे. निश्चितच शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार बनेल. काँग्रेस-राष्ट्रवादीशी व्यवस्थित संवाद झालेला आहे. संध्याकाळी शरद पवारांची छोटी बैठक होऊ शकते अशी शक्यताही राऊत यांनी व्यक्त केली आहे.