मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने चांगलाच हैदोस घालत असून पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच अहमदनगर, नाशिक याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत देखील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ऐन दिवाळीत परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे. सध्या खरीप पिकांची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी काढणी पूर्ण झाली आहे. पिकं शेतातच आहे, अशा स्थतितीतच पावसानं हजेरी लावल्यानं काही ठिकाणी जागेवरच पिकाची माती झाली आहे. तर काही ठिकाणी निम्म्याहून अधिक पिक वाया गेल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळं आम्हाला सरकारनं तत्काळ मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यानी केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या वाघूर नदीला पूर आला आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच लोकांना सतर्कतेचा इशारा देकील दिला आहे. दरम्यान, या पुरात एक शेतकरी वाहून जात असताना, गावकऱ्यांनी त्याला वाचवलं. पावसाच्या पाण्याने ओढ्याला पूर आला आहे. पुराच्या पाण्यानं शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
परभणी जिल्ह्यातील काही भागात पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. परभणी जिल्ह्यात परतीचा पाऊस थांबायचं नाव घेत नाही. आजही पहाटे जिल्ह्यातील सोनपेठ आणि जिंतूर तालुक्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आलं आहे. सोनपेठच्या नरवाडी आणि इतर परिसरामध्ये पाऊस झाला आहे.
तर दुसरीकडे जिंतूरच्या आसेगाव आणि दुधगाव या दोन्ही गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळं कोली या ओढ्याला पूर आला आहे. या पुराचं पाणी शेतकरी गजानन पवार यांच्या शेतात शिरल्यानं त्यांच्या शेताला अक्षरश तळ्याचे स्वरुप आलं आहे. काढणीला आलेलं सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने त्यांचे आणि इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात देखील ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. वसमत औंढा कळमनुरी तालुक्यासह हिंगोली तालुक्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं काढणीला आलेल्या कापूस, सोयाबीन,ऊस, तूर आणि हळदीचं मोठं नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळं फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातही शासन कुठल्याही प्रकारची मदत करत नसल्यानं शेतकऱ्यांनी फळबागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.