मुंबई – करोना व्हायरसमुळे या अगोदर रिझर्व बॅंकेने उदार पतधोरण जाहीर केले होते. त्यामध्ये भांडवल सुलभता आणि व्याजदर कमी करण्याचा समावेश होता. आता महागाई वाढणार असल्यामुळे व्याजदरात वाढ करण्याचे वेळापत्रक रिझर्व बॅंकेने ठरविले असले तरी ओमायक्रॉनमुळे पुन्हा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे रिझर्व बॅंक आणखी काही काळ उदार पतधोरण कायम ठेवू शकते असे अनेक अर्थतज्ञांना वाटते.
एचडीएफसी बॅंकेचे मुख्य अर्थतज्ञ अभीक बरुवा त्यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये चौथ्या तिमाहीत विकास दरावर 0.3 टक्के परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये रिझर्व बॅंक पतधोरण कडक ठेवणार नाही. किमान फेब्रुवारीच्या पतधोरणात तरी रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणार नाही असे त्यांना वाटते. व्याजदरात वाढ केल्यानंतर भांडवलाचा वापर कमी होईल. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणार नाही आणि भांडवल सुलभता कायम ठेवेल असे त्यांनी सांगितले.
युव्हीएस सिक्युरिटी या संस्थेच्या अर्थतज्ञ धनश्री गुप्ता जैन यांनी सांगितले की, रिझर्व बॅंक थांबा आणि वाट पाहा अशी भूमिका घेरण्याची शक्यता आहे. सध्या ओमायक्रॉनबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्याचबरोबर त्याचा लोकसंख्येवर किती परिणाम होणार आहे याचे मूल्यांकन झालेले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक फेब्रुवारी महिन्यात व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेण्याचे टाळेल.
या वर्षीचा विकास दर रिझर्व बॅंकेने 9.5 टक्के राहील असे गृहीत धरले आहे. मात्र जर परिस्थिती फारच बिघडली तर विकास दराच्या या आकडेवारीवर परिणाम होऊ शकतो असे ईक्रा या संस्थेच्या अर्थतज्ञ आदिती नायर यांना वाटते. भारतामध्ये अंतर्गत पातळीवर काही उपाय योजना केल्या जात असल्या तरी जागतिक परिस्थिती बिघडत असल्यामुळे आगामी काळामध्ये रुपयाच्या मूल्यावर मात्र दबाव कायम राहण्याची शक्यता बहुतांश अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रुपयाच्या मूल्यावर फारच दबाव आला तर रिझर्व बॅंकेला हस्तक्षेप करावा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.