नवी दिल्ली – प्राप्त संकेतानुसार 2030 पर्यंत भारत अर्थव्यवस्थेत जपानला मागे टाकेल. त्याचबरोबर या कालावधीत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जर्मनी आणि ब्रिटनपेक्षा जास्त होणार असल्याचे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे.
2030 नंतर भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होईल. अमेरिका आणि चीन पहिल्या दोन स्थानावर असणार आहेत. आयएचएस मार्किट या संस्थेने तयार केलेल्या माहितीनुसार सध्या भारत जगातील सहावी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, ब्रिटन हे देश भारताच्या पुढे आहेत. सध्या भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 2.7 लाख कोटी डॉलर आहे. 2030 मध्ये भारताचे उत्पन्न 8.4 लाख कोटी डॉलर होईल.
भारताची अर्थव्यवस्था सध्या जगातील इतर देशापेक्षा वेगाने वाढत आहे. पुढील दहा वर्षांमध्ये विकासदराचा हाच वेग कायम राहण्याची शक्यता आहे. भारतातील मध्यमवर्ग वेगाने वाढत असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मदत मिळत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतीय ग्राहकांकडून सध्या दीड लाख कोटी डॉलरच्या वस्तू आणि सेवांची खरेदी केली जाते. 2030 पर्यंत ही रक्कम तीन लाख कोटी डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये भारताचा विकासदर कोसळून उणे 7.3 टक्के झाला होता. दरम्यानच्या काळामध्ये भारताने उत्तम कामगिरी केली आहे आणि या वर्षी भारताचा विकास दर तब्बल 8.2 टक्के इतका होण्याची शक्यता आहे.
2022-23 मध्ये विकासदर 6.7 टक्के इतका होईल. हा विकास दर जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. भारताची देशांतर्गत बाजारपेठ मोठी असल्यामुळे भारतातील कंपन्याबरोबरच परदेशातील कंपन्या भारतातील मॅन्युफॅक्चरिंग, पायाभूत सुविधा आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहेत. भारतातील डिजिटल सेवा उद्योग वेगाने वाढत असल्यामुळे आगामी काळामध्ये ई-कॉमर्स क्षेत्र झपाट्याने विस्तारित होणार आहे.
सध्या भारतामध्ये 50 कोटी लोकांकडे इंटरनेट आहे. नजीकच्या भविष्यात ही संख्या 110 कोटीवर जाण्याची शक्यता आहे. भारतात लवकरच 5- जी सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे इंटरनेटवर आधारित स्टार्ट अप् आणि युनिकॉर्नची संख्या वाढेल असे या अहवालात म्हटले आहे. भारतातील कंपन्यामध्ये थेट परकीय गुंतवणूक वाढत आहे. गुगल,फेसबुक, ऍमेझॉन सारख्या कंपन्या भारतात गुंतवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे.