नवी दिल्ली -चीनकडून सीमेलगत पुलाची उभारणी सुरू असल्याच्या वृत्तावरून कॉंग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. सीमांवर घडत असणाऱ्या घडामोडी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षाविषयक मोठ्या त्रुटीच आहेत. त्यावर मोदी केव्हा बोलणार, असा सवाल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
पंजाब दौऱ्यावेळी मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळल्याच्या आरोपावरून सध्या राजकारण तापले आहे. त्याचा संदर्भ घेऊन मात्र त्या घडामोडीचा थेट उल्लेख टाळून राहुल यांनी ट्विटरवरून उपहासात्मक टिप्पणी केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सोशल मीडियावरून मोदींवर निशाणा साधला.
इतर कुठल्याही पंतप्रधानांनी पूर्व लडाख आणि अरूणाचल प्रदेशातील गंभीर सुरक्षाविषयक त्रुटींकडे लक्ष दिले असते. मात्र, प्रथमच पंतप्रधान स्वपक्षाच्याच कार्यकर्त्यांकडून सुरक्षेला धोका असल्याची चिंता व्यक्त करत आहेत, अशी खिल्ली खर्गे यांनी उडवली.
त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या एक व्हिडीओही शेअर केला. शेतकरी आंदोलकांनी रस्ता रोखल्याने मोदी पंजाबमधील एका उड्डाणपुलावर अडकून पडले. तो प्रकार मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी असल्याचा आरोप होत आहे. त्यापार्श्वभूमीवर, खर्गे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत मोदींच्या अडकून पडलेल्या वाहन ताफ्याजवळ भाजपचे कार्यकर्ते दिसतात.