370, 35 ए बाबत ओमर अब्दुल्लांची मागणी
श्रीनगर – केंद्र सरकार जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असलेले 370 कलम आणि 35 ए कलम रद्द करणार असल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. त्याबाबत आम्ही आज राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली आहे. त्यांनी असे काहीही होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही आम्हाला दिली असली तरी या बाबत केंद्र सरकारने संसदेत निवेदन देऊन स्पष्टीकरण केले पाहिजे अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की आम्ही आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याशी या बातम्यांच्या संबंधात चर्चा केली आहे. त्यांनी कलम 370 किंवा 35 ए रद्द केले जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. पण त्यांच्या म्हणण्यावर फार विश्वास ठेवता येत नाहीं कारण जम्मू काश्मीरच्या संबंधात दिल्ली सरकारचा निर्णय आणि भूमिका महत्वाची आहे. हीच भूमिका केंद्र सरकारने संसदेत निवेदन करून स्पष्ट केली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात केंद्राने 28 हजार जादा सैनिक तैनात केले आहेत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील जनता भयभीत आहे. त्यांना दबावात ठेवण्या मागची सरकारची भूमिकाही कळली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील जनतेने शांतता राखावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. राज्याच्या संबंधात येणाऱ्या कोणत्याही बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेऊन जनतेने कोणतीही आगळीक करू नये. तसे झाल्यास अन्य हितसंबंधीय त्या स्थितीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करतील असे आवाहनही ओमर अब्दुल्ला यांनी केले.