तुतीकोरिन – मालदीवचे माजी उपाध्यक्ष अहमद अधीब अब्दुल गफूर यांनी भारतात राजाश्रय मिळावा म्हणून मागणीकेली होती पण त्यांची ती मागणी भारताने फेटाळली असून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे. गफूर हे एका मालवाहू जहाजातून तामिळनाडुच्या किनाऱ्यावर गुरूवारी आले होते. त्यांच्या समवेत त्यांचे नऊ अन्य सहकारीही होते.
पण त्यांच्याकडे पासपोर्ट नसल्याने त्यांना भारतात प्रवेश करू देण्यात मनाई करण्यात आली. त्यांना जहाजातून उतरू देण्यात आली नाही. विविध केंद्रीय संस्थांनी त्यांची जहाजावरच चौकशी केली. त्यावेळी आपल्याला भारतात राजाश्रय मिळावा म्हणून त्यांनी विनंती केली होती. पण भारत सरकारने त्यांची ही विनंती अमान्य करून त्यांना मायदेशी परत पाठवून दिले. आपल्या जीविताला आपल्या देशात धोका असल्याने आपण तेथून निसटून आलो आहोत असे त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सांगितले होते.