नवी दिल्ली : करोना व्हायरसने गेल्या दोन वर्षांत जगात धुमाकूळ घेतला आहे. दरम्यान, भारतात सध्या करोनाची तिसरी लाट आली आहे. देशात दररोज 3 लाखांहून अधिक दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे.
करोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने WHO ने नवा महत्वाचा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे कि, करोनाचा ओमायक्रॉन हा शेवटचा व्हेरियंट नाही, BA.2 सारखे स्ट्रेन भविष्यात अनेक दिसून येतील. भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिएंट आता देशात कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यावर पोहोचला आहे. याचा अर्थ असा आहे की, कोणतीही व्यक्ती, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न येता किंवा संक्रमित ठिकाणी भेट न देता, करोना पॉझिटिव्ह होईल.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या एका अभ्यासानुसार, 6 फेब्रुवारीपर्यंत भारतात करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढणार आहे. म्हणजेच, पुढील 2 आठवड्यांपर्यंत 6 फेब्रुवारीपर्यंत करोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असतील. अभ्यासात म्हटले आहे की, ‘आर-व्हॅल्यू’, जे करोनाच्या संसर्गाचा प्रसार दर सांगते, ते 14 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान आणखी कमी होऊन 1.57 वर आलं आहे. जर हा दर एकापेक्षा कमी झाला तर असं मानलं जातं की, जागतिक महामारी संपली आहे.
दुसरीकडे, बनारस हिंदू विद्यापीठाचे व्हायरोलॉजिस्ट प्रोफेसर सुनीत के. सिंह म्हणतात की, करोनाचे नवीन प्रकार चिंतेचा विषय आहेत. ओमायक्रॉनचा जो नवा व्हेरियंट समोर येत आहे. चाचणी मार्फत त्याची ओळख करणं अवघड आहे. त्यांचे म्हणणे आहे की, करोनाच्या नव्या व्हेरियंटची ओळख जिनोम सिक्वेंसिंगद्वारे केली जाऊ शकते. परंतु, जोपर्यंत जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल येतो. तोपर्यंत त्या व्यक्तीमुळे इतरांना त्याची बाधा झालेली असते. म्हणजेच, संसर्गाचा वेग अधिक असतो.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव अनेकांसाठी चिंतेचा विषय असू शकत नाही, परंतु व्हायरसमध्ये वारंवार होणाऱ्या उत्परिवर्तनामुळे हा प्रकार किती धोकादायक असू शकतो, याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेला चिंता आहे. WHO चे म्हणणे आहे की, भारतात करोना संसर्गाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांमुळे दक्षिण-पूर्व आशियामध्ये संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे.