भवानीनगर – ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड केली जाते. परंतु या तंटामुक्त समितीमध्ये किती आणि कोण नागरिक आहेत. याची पाटी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कोरीच असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक गावात ही समिती कार्यरत आहे. अनेक गावांना तंटामुक्ती बाबत पुरस्कारही मिळालेले आहेत. परंतु या समितीचा अध्यक्ष सोडले तर इतर सहभागी सदस्यांची नागरिकांना माहितीच नसते. या समितीचा फलक ग्रामपंचायतींमध्ये लावणे बंधनकारक आहे. परंतु जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये समितीचे फलकच नसल्याचे निदर्शनास येत आहे.
न्यायव्यवस्थेवरील ताण काही प्रमाणात कमी व्हावेत, दिवाणी दावे, बांधावरील वाद व गावातील किरकोळ वाद हे गावांमध्येच मिटविण्यासाठी शासनाने गाव पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त ही योजना अंमलात आणली. या योजनेमध्ये ग्रामसभेतून गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवडली जाते. या अध्यक्षाच्या खालोखाल सर्व समावेशक सदस्यांची निवड केली जाते. परंतु या सदस्यांची अनेक गावांमध्ये ग्रामस्थांना माहितीच झालेली नाही. यामध्ये असणाऱ्या सदस्यांची नावे मात्र ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावली जात नाहीत. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तंटामुक्त समितीची पाटी लावणे बंधनकारक आहे. परंतु इंदापूर तालुक्यातील कित्येक गावांतील ग्रामपंचायतीमध्ये या समितीची पाटीच लावण्यात आलेली नाही.
ग्रामिण भागात अजूनही या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाबाबत गावागावात पूर्णपणे जनजागृती झालेली नाही. गावातील कोणताही तंटा मिटवताना या तंटामुक्त समितीमध्ये जे सदस्य असतील, त्या सर्व सदस्यांना तंटा मिटवण्यापूर्वी तसेच तंटा मिटवण्याच्या जागी बोलवणे गरजेचे आहे. अध्यक्ष सोडले तर इतर सदस्यांना याबाबत माहितीच नसते. म्हणून राज्य सरकारने पुन्हा एकदा नव्याने ग्रामीण भागातील गाव पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त योजना व तिचे स्वरूप सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त समितीमध्ये कोणकोणत्या विभागातून सदस्यांची नावे निवडली जातात, याची माहिती नागरिकांना देऊन गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समिती ही नावारूपाला आणली पाहिजे.
महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाच्या माध्यमातून गाव पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त समिती अभियान हे राबवल्याने नक्कीच चांगल्या प्रकारे गावांना फायदा झाला आहे. हे काम ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे राबवले जात आहे. परंतु यासाठी गाव पातळीवर गावाच्या माध्यमातून निवडण्यात आलेली महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष्यांपासून ते सर्व सदस्यांपर्यंत ज्यांची निवड झाली आहे. त्या सर्वांना गावातील तंटे मिटविण्यासाठी निमंत्रित करण्यात येत नसल्यामुळे सदस्यांमध्ये नाराजी पसरल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही योजना अजूनही सक्षम करण्यासाठी आणि गावपातळीवर अभियानाला बळकटी मिळण्याची गरज आहे.
तंटे मिटतात; पण समिती अंधारात
गावामधील तंटे मिटवण्याचे काम तंटामुक्त अध्यक्ष आणि गावातील प्रतिष्ठित तीन-चार लोक मिळून करत असतात. या समितीमध्ये इतर सदस्यांना ज्या ठिकाणी तंटा झालेला असेल त्या ठिकाणी अधिकृतरित्या बोलवलेही जात नाही. त्यामुळे गावातील तंटे मिटतात. पण समिती अंधारात राहते, अशा चर्चेला गावागावांत उधाण आले आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक गावामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त अभियान अंतर्गत तंटामुक्त समिती ग्रामसभेमध्ये निवडली जाते. त्या समितीची यादी त्या भागातील पोलीस ठाण्यामध्ये देणे बंधनकारक आहे. याबाबत भवानीनगर दूरक्षेत्रामध्ये येणाऱ्या गावांनी तंटामुक्त समितीची यादी दिलेली आहे. परंतु ज्या गावाने अद्यापही यादी पोलीस ठाण्यात दिलेली नाही. त्या गावांनीही तंटामुक्त समितीची यादी पोलीस ठाण्यात देणे गरजेचे आहे.
-संजय धोतरे, पोलीस उपनिरीक्षक, वालचंदनगर.