विलास मादगुडे
हिरडस मावळ – वरंधा घाट सुरक्षिततेसाठी बंद केला मान्य आहे,पण या मार्गावर असणाऱ्या गावांतील विद्यार्थी, नागरिक, रुग्ण, बाजारहाट यासाठी प्रशासनाने काय सुविधा केल्या आहेत, हा प्रश्न आहे. महामंडळाच्या एसटी बस, खाजगी वाहने बंद झाली.
दळणवळणच ठप्प झाले आहे. प्रशासनाने कमीत कमी हलक्या वाहनांची बंदी उठवावी, अशी मागणी प्रवासी, नागरिक करीत आहेत.
भोर-महाड मार्ग हा कोकणात जाणारा नजीकचा मार्ग आहे, त्यामुळे पुण्यासह इतर भागातून जाणाऱ्या वाहनांची येथे वर्दळ असते; परंतु पावसाळ्यात दरडी कोसळतात त्यामुळे सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हा मार्ग सध्या सर्व वाहनांसाठी बंद केला आहे. अर्थातच यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि तेथून घाटावर येणाऱ्या प्रवाशांची आणि मालवाहू गाड्यांची गैरसोय झाली आहे.
महाड-बिरवाडी परिसरात औद्योगिक वसाहत आहे, त्यामुळे या ठिकाणी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा नजीकचा मार्ग, अतितातडीच्या वेळी पुणे येथे हॉस्पिटलमध्ये तात्काळ जाण्यासाठीचा सोईचा मार्ग, कोकणातील तरकारी वाहतूक, प्रवासी वाहने, महामंडळाच्या 20-25 एसटी बसचा मार्ग, घाटात येणारे पर्यटक, घाटमाथ्यावरील गावातील लोक दवाखाना-बाजारहाट साठी कोकणातच जातात आदी सर्वांसाठीच या वरंधा घाटाचा वापर केला जातो; हिर्डोशी भागातील बरेचसे नागरिक कामाधंद्यासाठी कोकणातच आहेत, या सर्वांचीच हा घाट बंद केल्याने गैरसोय झाली आहे.
गेल्या दोन-चार वर्षांपासून अतिवृष्टी व दुरुस्तीसाठी नेहमीच घाट बंद केला जात आहे. मात्र, दरड कोसळून जीवितहानी झाली अशी एकही घटना आजपर्यंत घडली नाही. यावर्षी दरडही पडली नाही, तरीही रस्ता बंद केला आहे. सध्या वरंधा घाटात मातीचे ढिगारे टाकून तर निगुडघर येथे चेकपोस्ट उभारून रस्ता दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे.
प्रवाशांसह स्थानिक वेठीला
गेल्या चार वर्षात रस्त्याची कामे, सुरक्षित वाहतुकीसाठी सुविधा होणे गरजेचे होते; परंतु तसे झाल्याचे दिसत नाही. करोडोंचा निधी वापरूनही आजपर्यंत सुरक्षित उपाययोजना नसल्याने हा घाट दर पावसाळ्यात बंद ठेवण्याची वेळ येत आहे. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करुन घाट सुरळीत करण्य ऐवजी दर पावसाळ्यात घाट वाहतुकीस बंद करून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.
दरडी नाही प्रशासनच घाटात ठेवते दगड
महाड ते भोर या घाटातील रस्त्यापेक्षा पोलादपूर-महाबळेश्वर हा रस्ता कितीतरी पटींनी धोकादायक असून तो व्यवस्थित चालू असतो किंवा दरड येऊन रस्ता बंद झाला तरी दरड तात्काळ हटवून रस्ता चालू केला जातो. वरंधा घाटात प्रशासनच रस्त्यावर दगड टाकून व चेकपोस्ट उभारून महाड-भोर रस्ता बंद ठेऊन काय साध्य करायचा प्रयत्न करत आहे.